विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी फडणवीस म्हणाले, हे भाषण करताना माझे मन जड झाले आहे. सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पद आणि वित्त विभागाची धुरा सांभाळणारे राज्याचे लाडके नेते अजित पवार आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं असं भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावाने “गतिमान नागरी सेवा” हा पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा करतो. दिवंगत अजित पवार यांना आजचा हा अर्थसंकल्प समर्पित करतो असे फडणवीस म्हणाले.
मुंबई येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता जून २०२६ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्यात येईल. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम काम जूनपर्यंत होईल. तर योजना पण लवकरच सुरू होईल.
महात्मा फुले यांच्या जयंतीला २०० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने एक समिती स्थापन करून विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतील. संत गाडगेबाबांचं १५० वं जयंती वर्ष आहे. त्यामुळे एक सर्किट तयार करणार. संत गाडगेबाबा ग्राम योजना राबवणार. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सोयीसुविधांसाठी तरतूद करण्यात येणार आहे.२०२६-२०२७ हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळा झाला. देहू येथील तुकारामांच्या जन्मस्थानाचं जनत आणि संवर्धन करू, असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले.
मुंबई पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल, असे फडणवीस यांनी आश्वासन दिले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम २०२७पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल. तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
ज्योतिर्लिंगाबाबत मोठी घोषणा
12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रामध्ये आहे. या ज्योतिर्लिंगांसाठी यंदाच्या बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट सादर करताना सांगितले की, ५ ज्योतिर्लिंगांसाठी पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवले आहे. पुढे ते म्हणाले की त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल.
महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग कोणते?
महाराष्ट्रात नाशिक येथे त्र्यंबकेश्वर, पुण्यातील खेडमधील भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळजवळील घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातील परळी येथील वैजनाथ मंदिर आणि हिंगोलीतील औंढा नागनाथ ही पाच ज्योतिर्लिंग आहेत. या पाचही ज्योतिर्लिंगांसाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.