संजय महाजन, साम टीव्ही
जळगाव: देशातील सोन्या चांदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या जळगावसह संपूर्ण देशातील सराफा बाजारासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने चांदीच्या आयातीबाबत एक मोठा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. चांदीच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर आता सरकारने चांदीची आयात मुक्त श्रेणीतून थेट मर्यादित श्रेणीत टाकली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात भारतीय सराफा बाजारात आणि चांदीवर आधारित उद्योगांमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.
केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर निर्बंध लादल्यामुळे आता देशात होणारी चांदीची आवक मर्यादित होणार आहे. आयात मर्यादित झाल्यामुळे बाजारात चांदीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे. परिणामी आगामी काळात चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता जळगावच्या नामांकित सराफा व्यवसायिकांनी वर्तवली आहे.
जळगावच्या सुवर्णनगरीत सध्या सोन्या-चांदीच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. बाजारातील ताज्या घडामोडींनुसार:
सोने: जीएसटीसह (GST) तब्बल १ लाख ६३ हजार रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम).
चांदी:२ लाख ७५ हजार रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचली आहे.
केंद्र सरकारने चांदीच्या आयातीबाबत एवढा मोठा निर्णय घेतला असला, तरी जळगावच्या स्थानिक बाजारपेठेत आज चांदीच्या किमतींवर याचा तातडीने कोणताही परिणाम झालेला नाही. आज बाजारात भाव पूर्णपणे स्थिर आहेत. मात्र, हा निर्णय दीर्घकालीन असल्याने भविष्यात चांदीच्या पुरवठ्यावर जसा परिणाम होईल, तसे भाव वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
१. आयात शुल्क वाढ: सरकारने आधी चांदीवरील आयात शुल्कात वाढ केली होती.
२. श्रेणी बदलली: आता चांदीची आयात 'मुक्त' नसल्याने, कोणतीही कंपनी किंवा व्यापारी थेट चांदी आयात करू शकणार नाही, त्यासाठी सरकारचे विशेष नियम आणि परवानग्या लागतील.
३. उद्योगांवर परिणाम: चांदीचा वापर दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे या क्षेत्रांवरही याचा प्रभाव पडेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.