भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या 1984 मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’बाबत वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापलं आहे. ते म्हणाले होते अमृतसरच्या सुवर्णमंदिरात झालेली ही लष्करी कारवाई ‘काळा दिवस’ होता. या कारवाईत शीख बांधव शहीद झाले, असेही ते म्हणाले. तसेच या घटनेची तुलना त्यांनी अहमदशहा अब्दालीच्या हल्ल्याशी करत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. दमदमी टकसालच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
यावरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. प्रधानमंत्री संस्थात्मक पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणे हे भारतीयांचे काम आहे. पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. पंतप्रधान होण्याआधी नेहरूंनी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्याचे काम केले. मोलाची कामगिरी केली. हा इतिहासाचा भाग आहे. हे विसरू शकत नाही. तसेच नेहरू हे सुविद्य गृहस्थ होते. संघर्ष करणारे होते. स्वातंत्र्याआधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले, संघर्ष केला. गांधींच्या नेतृत्वाखाली तुम्हाला, मला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून ओळख मिळाली. यामध्ये नेहरूंची कामगिरी मोठी होती. ती विसरता येणार नाही असे शरद पवार यांनी सुनावले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’वरील वक्तव्यावर संताप व्यक्त करत जोरदार टीका केली. देशाची अखंडता आणि सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या कारवाईला ‘काळा दिवस’ म्हणणे म्हणजे देशद्रोहासारखे असल्याचे ते म्हणाले. ही कारवाई देशासाठी होती आणि त्यासाठी माजी लष्करप्रमुख जनरल अरुण वैद्य यांनी बलिदान दिले, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
गिरीश महाजन यांच्या व्यक्तव्यानंतर राज्यात राजकारण तापले असून विरोधकांनी महाजन यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाजन यांची पाठराखण केली. महाजनांनी शीख समाजाचा गौरव केला, त्यांचे संपूर्ण भाषण हे समाजाप्रति गौरव करणारे होते. त्यांनी कुठलेही चुकीचं विधान केलेलं नाही. तसेच नेहरू-मोदींची तुलना करण्याचा विषय नाही, मोदी आणि नेहरू यांचे कार्य सर्वांना माहिती आहे. काँग्रेसनं शीख समाजावर अत्याचारच केला. काँग्रेसचा जन्मभर निषेध करतच राहू असे फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.