देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून आता या प्रचंड गर्मीचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून येतोय. रुग्णालयांमध्ये उष्माघात, डिहायड्रेशन आणि उन्हामुळे होणाऱ्या त्रासाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. डॉक्टरांच्या मते, सतत कडक उन्हात राहिल्याने शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकतं आणि काही वेळा ही परिस्थिती जीवघेणीही ठरू शकतं.
दिल्ली-एनसीआरमधील अनेक रुग्णालयांमध्ये सध्या डिहायड्रेशन आणि हीटवेवशी संबंधित तक्रारी घेऊन रुग्ण दाखल होतायत. विशेषतः लहान मुल, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून इतर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांमध्ये हा धोका अधिक वाढल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या इंटरनल मेडिसिन विभागाच्या व्हाइस चेअरमन डॉ. सुशीला कटारिया यांनी सांगितलं की, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याची क्षमता मर्यादित असते. उष्णता त्या मर्यादेपेक्षा वाढली की शरीरात पाणी आणि मिठाचं प्रमाण कमी होऊ लागतं.
डॉ. सुशीला पुढे म्हणाल्या की, हीट एग्झॉशनची सुरुवातीची लक्षणं म्हणजे सतत डोकेदुखी होणं, स्नायूंमध्ये गोळे येणं, मळमळ, अशक्तपणा आणि चक्कर येणं. वेळेत उपचार न घेतल्यास ही स्थिती पुढे हीट स्ट्रोकमध्ये बदलू शकते. त्यामुळे मेंदू आणि किडनीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
या वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणं टाळावं. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी, नारळपाणी आणि ओआरएसचं सेवन करावं. मात्र चहा आणि कॉफीसारखी पेयं शरीरातील पाण्याचं प्रमाण आणखी कमी करू शकतात. त्यामुळे त्यांचं सेवन मर्यादित केलं पाहिजे.
याशिवाय हलक्या रंगाचे, सैल आणि सूती कपडे वापरण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. फुफ्फुसे, हृदय किंवा किडनीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी हवामानात बदल होत असताना नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काही गंभीर लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. एखाद्या व्यक्तीला सतत गोंधळल्यासारखं वाटणं, बोलताना अडचण येणं, जास्त सुस्ती जाणवणं, बेशुद्ध पडणं किंवा झटके येणं अशी लक्षणं दिसत असतील तर ती गंभीर न्यूरोलॉजिकल इमर्जन्सीची लक्षणंम असू शकतात. अशा वेळी तात्काळ वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.
डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात लोक डोळ्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. मात्र तीव्र उष्णता आणि कडक उन्हामुळे डोळ्यांत जळजळ होणं, संसर्ग होणं आणि डोळे कोरडे पडण्याचा धोका वाढतो. याशिवाय सतत थकवा जाणवणं, उलट्या होणं, शरीर खूप गरम होणं, हृदयाचे ठोके वेगाने वाढणं आणि स्नायूंमध्ये आकडी येणं ही देखील हीट स्ट्रोकची महत्त्वाची लक्षणं असू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.