

महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले तरी तो अद्याप सक्रीय झाला नाही
अरबी समुद्रातील परिस्थितीमुळे मान्सूनची गती मंदावली
२० जूननंतर मुंबईसह राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता
हवामान खात्याने शेतकऱ्यांना पेरणी पुढे ढकलण्याचा सल्ला दिला
नैऋत्य मौसमी वाऱ्यांची गती मंदावल्यामुळे जून महिन्याची १५ तारीख ओलांडून देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत नाही. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत देशात ७१ टक्के पावसाची कमतरता जाणवत आहे. मान्सून अद्याप सक्रीय न झाल्यामुळे सर्वसामान्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण चिंतेत आले आहे.
देशात जून महिन्यातील सरासरी पर्जन्यमान १६५.३ मिमी आहे. पहिल्या १५ दिवसांत ६२.१ मिमी पावसाचा अंदाज होता. पण फक्त ४२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. केरळमधील मान्सूनच्या आगमनामुळे आणि उत्तर भारतातील पश्चिमी वाऱ्यांमुळे झालेल्या पावसाचा विचार केला असता देखील आकडेवारी कमी होत आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती तर खूपच गंभीर आहे. जून महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत राज्यात फक्त २१.३ मिमी पाऊस पडला. जो ७२ टक्के सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत लक्षणीय घट आहे.
जळगाव, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, अकोला आणि अमरावती यासारख्या काही जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस पडला आहे. पण राज्यातील इतर जिल्ह्ये अद्यापही पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस न आल्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. पावसाला उशिर होत असल्यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना पेरण्या पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाने सांगितले की, सोमवारी मान्सूनने ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये प्रवेश केला. पण महाराष्ट्रात तो थांबण्याचे मुख्य कारण अरबी समुद्रावरील अनुकूल परिस्थितीचा अभाव आहे. पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
२० जूनच्या सुमारास अरबी समुद्रातील परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. यामुळे किनारपट्टीच्या भागात पावसाचे प्रमाण वाढेल. त्यानंतर राज्यभर मान्सून पुन्हा सक्रीय होईल. मुंबईत मान्सून दरवर्षी लवकर दाखल होते. पण यावेळी ११ जूनची तारीख ओलांडली तरी देखील पाऊस आला नाही. मुंबईत फक्त १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मुंबईत २५ जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० जूननंतर मान्सूनचा जोर वाढेल.
महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रामध्ये ८ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. दक्षिण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीतील हरनाईपासून सातारा आणि सोलापूरपर्यंत पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाचा वेग मंदावला. विदर्भ आणि मराठवाड्यात तर काही भागांमध्येच पाऊस पडला. तर इतर ठिकाणी प्रचंड उष्णता आणि कोरडे वारे वाहत आहेत. सध्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.