
मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून लाखो प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. लोकल ट्रेनमधील गर्दीत धक्के खात ऑफिसला जावं लागत आहे. या लोकल गर्दीने आतापर्यंत अनेक बळी घेतले आहेत. गेल्या दशकभरात हजारांहून अधिक जणांचे बळी लोकल गर्दीने घेतले आहेत. निवडणुका येण्याआधी आणि निवडणुकीनंतरही वाढत्या लोकल गर्दीचा प्रश्न कायम राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच वाढत्या गर्दीचा प्रश्न काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रवासी महासंघाने आमदार राजेश मोरे यांच्यापुढे मांडला. यावेळी ठाणे ते कर्जत, कसारा दिशेने जाणाऱ्या शटलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी आमदार राजेश मोरे यांना केली. त्यामुळे मुंबईच्या लोकल गर्दीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
गेल्या दशकभरात कर्जत, कसारा भागात लोकवस्ती वाढली आहे. कर्जत, कसारा, बदलापूर या भागातून मुंबई, ठाणे या भागात नोकरी आणि व्यवसायासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. या भागातील बहुतांश घरातील किमान एक व्यक्तीचा मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास होतो. त्यामुळे खोपोली, कर्जत, कसारा या भागातून सुटणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते.
अनेक प्रवाशांना गर्दीमुळे लोकल ट्रेनमध्ये चढताच येत नाही. त्यामुळे अशा प्रवाशांचा कार्यालयाच्या ठिकाणी लेटमार्क ठरलेलाच असतो. त्यामुळे लोकल गर्दीवर नियंत्रण मिळावे, यासाठी लोकल प्रवासी संघटनांकडून सातत्याने रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणे सुरु आहे.
मध्य रेल्वेवरील गर्दी कमी करण्यासाठी लोकल प्रवासी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात शटल सेवा सुरु कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. ठाणे-बदलापूर, ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा, ठाणे-टिटवाळा, ठाणे-खोपोली अशा शटल सेवा सुरु कराव्यात अशी मागणी लोकल प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानकात सांयकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी पाहायला मिळते. कामावरून सुटल्यानंतर ठाणे रेल्वे स्टेशनवरून घरी निघालेल्या प्रवाशांना लोकलमध्ये गर्दीच्या लोंढ्यामध्ये चढणे हे मोठं आव्हानच असतं. या स्टेशनवरून एखादी ट्रेन सुटली तरी दुसऱ्या ट्रेनसाठी अर्धा ते पाऊण तास स्टेशनवरच थांबावे लागते. यामुळे सांयकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत ठाणे रेल्वे स्टेशनवरुन दर पंधरा ते वीस मिनिटाला कर्जत, कसारा, खोपोली, आसनगाव या दिशेने शटल सेवा वाढवण्यात याव्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ठाण्यावरून शटल सेवेमध्ये वाढ केल्यास लोकल ट्रेनची गर्दी कमी होऊ शकते. ठाणे स्टेशनवरील गर्दी कमी झाल्याने अपघात कमी होतील. यामुळे निष्पाप प्रवाशांचे जीव वाचतील. ठाणे आणि परिसरात काम करणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांचा कर्जत , कसाऱ्याकडे जायचा प्रवास सुखकर होईल. सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये ठाणे ते खोपोली, कसारा या भागात शटल सेवांची संख्या वाढवल्यास गर्दी कमी होण्यास मदत मिळू शकते.
कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव म्हणाले, 'आम्ही कल्याण कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मागील 14 वर्षांपासून ठाणे कसारा, ठाणे कर्जत किंवा कल्याण कसारा, कल्याण कर्जत शटल सेवा सुरू करा, या बाबत सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र या दोन्ही मार्गावरील मेल एक्स्प्रेस वाहतुकीमुळे वेळ मिळत नसल्याने शटल सेवा सुरू करता येत नाही, असे उतर दिले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.