
राज्यात मागील २४ तासांत वेगवगेळ्या भागांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळाला आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहिलं, तर विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा जोर अधिक जाणवला. तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विदर्भातील अकोला आणि मालेगावात तापमानाने चाळीशीचा टप्पा पार केला असून, ४३ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये राज्यात पुन्हा हवामान बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः विदर्भाच्या पूर्व भागात उन्हाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुण्यात सलग तीन दिवस उष्णतेचा तडाखा सहन केल्यानंतर काल गुरुवारी तापमानात थोडीशी घट झाली. मात्र, ही स्थिती तात्पुरती असून, पुढील तीन दिवस तापमान पुन्हा वाढणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.