

मुंबईतील कूपर रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू
दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ
आयसीयूमध्ये बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंधेरीतील कूपर रुग्णालयात बेड अभावी गेल्या २ दिवसांत २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य खात्याच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. गरजू रुग्णांना तातडीने उपचार मिळणे अपेक्षित असताना आयसीयू बेडच्या कमतरतेमुळे २ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत गोरेगाव येथे राहणारी २७ वर्षीय संध्या यादवला शनिवारी सकाळी तीव्र पोटदुखीचा त्रास झाल्याने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले. मात्र रात्री पुन्हा प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला पुन्हा रुग्णालयात आणले. यावेळी आयसीयूमध्ये बेड नसल्याचे सांगत डॉक्टरांनी तिला स्ट्रेचरवर ठेवून उपचार सुरू केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. उपचारादरम्यान ती स्ट्रेचरवरून खाली पडल्याचा आवाज आल्यानंतर नातेवाईकांनी धाव घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी बाहेर जाण्यास सांगितले. मात्र नेमके काय झाले? याबाबत स्पष्ट माहिती दिली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर रविवारी सकाळी संध्या यादवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दुसऱ्या घटनेत नालासोपारा येथील ३८ वर्षीय कैलास सिंह यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज असतानाही बेड उपलब्ध नसल्याने जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी पूजा सिंह यांनी “जर आयसीयूची गरज असलेल्या रुग्णालाच बेड मिळत नसेल तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचं?”, असा सवाल करत रुग्णालयातच आक्रोश केला.
या दोन घटनांनंतर पालिकेच्या आरोग्य खात्याला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मुंबईसारख्या महानगरात पालिकेच्या मोठ्या रुग्णालयात आयसीयू बेडची इतकी टंचाई का? सर्वसामान्य रुग्णांना बेड नाकारले जात असताना काही बेड आरक्षित का ठेवले जातात? रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य सुविधा वाढवण्यात पालिका अपयशी ठरली का? रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ, यंत्रणा आणि जबाबदारीचा अभाव आहे का?, असे सवाल विचारले जात आहेत.
पालिका दरवर्षी आरोग्य विभागासाठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करते. मग तरीही रुग्णांना स्ट्रेचरवर उपचार का करावे लागत आहेत? आयसीयू बेडअभावी जीव जात असतील तर त्या खर्चाचा उपयोग नेमका कुठे होतोय, असा संतप्त सवाल मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. कूपर रुग्णालय प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेकडून या दोन्ही मृत्यूंची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई होणार का?, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी पालिकेचे आरोग्य खाते जागे होणार का? हा खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.