

मुंबईतील तीव्र उन्हाळा आता पचनसंस्था आणि आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे दूषित अन्न, डिहायड्रेशन आणि बदललेल्या जीवनशैलीशी संबंधित पोटाच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
साधी अॅसिडिटी किंवा पोटदुखी सारख्या अनेक समस्या आता उष्णतेमुळे वाढलेल्या जिवाणू संसर्ग आणि डिहायड्रेशनमुळे होतात. उन्हाळ्याच्या स्वच्छतेची सवय अंगीकारल्यास तसंच पुरेसं पाणी पिणं आणि उघड्यावरील अन्नपदार्थाचे सेवन टाळल्याने संसर्गाचा धोका कमी करता येऊ शकतो.
मुंबईतील झायनोवा शाल्बी हॉस्पिटल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. ऋषिकेश मलोकर यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेमुळे पोटाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः ३० ते ४५ वयोगटातील रुग्ण जुलाब, मळमळ, उलट्या आणि अशक्तपणाच्या तक्रारींसह येत आहेत. अनेकदा रुग्ण ही लक्षणं व्हायरल संसर्गाची असल्याचं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्यक्षात मात्र तो उष्णतेमुळे अन्न व पाण्यात वाढलेल्या बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग असतो.
ते पुढे सांगतात का, जास्त उष्णतेमुळे अन्न व पाणी लवकर दूषित होते. त्यामुळे शक्यतो ताजं, घरचं अन्न खावं, उघड्यावरचे अन्नपदार्थ, कापलेली फळं किंवा बर्फाचे गोळे खाणं टाळावं. या दिवसात पुरेसे पाणी पिणं अत्यंत गरजेचे आहे. निर्जलीकरणामुळे आतड्यांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि संसर्गाचा धोका वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, वाढत्या उष्णतेबरोबरच चुकीच्या सवयी, शरीरातील पाण्याची कमतरता , उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन आणि सतत एसीचा वापर यामुळे पोटाच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम जैन यांनी सांगितलं की, मुंबईकर सध्या तीव्र उष्णतेची लाट दिसून येते. शहरातील वाढत्या तापमानामुळे २५ ते ५५ वयोगटातील लोकांमध्ये पोटाच्या संसर्गाच्या (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन्स) प्रकरणांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे.
उष्णतेमुळे अन्न आणि पाण्यावाटे बॅक्टेरिया वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पोटाच्या तक्रारींचा धोका वाढतो. सध्या अशा संसर्गांमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली असून नागरिकांना ही समस्या सतावत आहे. दर महिन्याला १० पैकी ३ रुग्णांमध्ये डिहायड्रेशन, जुलाब, पोट फुगणं, गॅस, ॲसिडीटी, मळमळ, उलट्या आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणं दिसून येतात.