
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुंबईमध्ये निर्धार शिबीर होत आहे. या शिबीरामध्ये भाषण करताना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मुंबईतल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची नक्कल देखील केली. 'यांचं पद गेलं पण मुंबई खड्डेमुक्त झालेली नाही.', असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
मुंबईच्या विकासाचा मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, 'कोस्टल रोडचं काम लवकर पूर्ण झालं पाहिजे होतं. अटल सेतूचे काम लवकर यांनी केले नाही. माझ दुःख एवढं आहे की ५ सरकार राहिलं असतं तरी मुंबईचा विकास आणखी झाला असता. मुंबईला आपल्या शिवसेनेचा महापौर का हवाय ते मी सांगतो. रस्ता घोटाळा एवढा सुरु आहे त्याबद्दल वारंवार बोलत आलो आहे. बीएमसी एवढे रस्ते खोदत आहेत की त्यांना काहीतरी मिळणार आहे म्हणून ते खोदत आहेत.'
एकनाथ शिंदे यांची नक्कल करत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्याच्या मुद्द्यावर बोलताना जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की,'यांचं सरकार आलं आणि म्हणायला लागले आम्ही मुंबईला खड्डे मुक्त करू. अजून खड्डे मुक्त मुंबई झाली नाही. यांचं पद गेलं पण मुंबई खड्डेमुक्त झालेली नाही.'
तसंच, 'असे घोटाळे बाहेर काढल्यानंतर पाच कॉन्ट्रॅक्टरनी मला फोन करायला सुरवात केली. पण मी त्यांना सांगितलं मला तुम्हाला भेटायचं नाही. मी विकलो जाणारा नाही मी लढणारा आहे. त्यांना मी सांगितलं की तुमचं नाव मी घेतलेलं नाही. माझा लढा या टक्केवारी विरोधात आहे. मुंबईला विकणाऱ्या भाजप विरोधात आहे. गेल्या २ वर्षांत मिंधे सरकार आणि भाजप सरकारच्या काळात पालिका रुग्णालयात औषध मिळत नाहीत. खेकडे फेम मंत्र्यांनी किती घोटाळे केले तुम्हाला माहिती आहेत.' , असं देखील आदित्य ठाकरेंनी सांगितले.
आदानी ग्रुपवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'माझ्या कानावर असं आहे की मेच्या शेवटी निवडणूक घेण्याचा भाजपचा डाव आहे. कारण की यावेळेस कोकणी माणूस गावाला जातो. तुम्ही आहात का निवडणूक लढायला? नवी मुंबई एअरपोर्ट होतंय पण त्याला अजूनही दि. बा पाटील यांचं नाव दिलेलं नाही. काही दिवसांनी हेही अदानीकडे दिलं जाईल पण आपण हे होऊ देणार नाही. मुंबईतले अनेक ब्रिजचं काम सुरू केलं आहे. अनेक दिवस ते बंद ठेवण्याचा डाव यांचा आहे. कारण ब्रिज बंद असल्याने लोकं कामावर जाणार नाहीत. गेले तरी ट्राफिक समस्या त्यानंतर त्या कंपन्या हळूहळू बाहेर जातील.'
दरम्यान, 'मुंबईत काय करायचं असेल तर पालिकेला नाही किंवा राज्य सरकारला विचारायच नाही तर भाजपचा मालक अदानीला विचारायचं आहे. विचार करा की मुंबईचा मालक कोण आपण की अदानी. माझ्या मुंबईला लुटू द्यायचं नाही हा निर्धार आता करायचं आहे. मुंबादेवीच्या नावावरून माझ्या मुंबईच नाव पडलं आहे. मी कोणाला मुंबई लुटू देणार नाही. तुम्हाला नगरसेवक पदाची तिकीट दिली जातील. पद विकली जातील. पण मी एकटा लढेन लढताना रक्तबंबाळ झालो तरी चालेल पण मुंबईसाठी लढणार एवढं नक्की. असच शिबीर सत्ताधारी नगरसेवकांचं घ्यायचं असेल तर आपल्याला लढायला हवं.', असे आवाहन आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.