बारामती–फलटण–लोणंद ६४ किमी नव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला वेग.
२६२ पैकी २४० हेक्टर जमीन अधिग्रहित
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ स्थानकांचा विकास
पुणे जंक्शनवर नवीन फलाट व आधुनिक सुविधांची भर
भारतीय रेल्वे दिवसेंदिवस विविध उपक्रम राबवून रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल करताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रभर नवीन लोह मार्गांचे बांधकाम सुरु असून विविध पुनर्विकास उपक्रमांच्या बाबतीत लक्षणीय प्रगतीचे काम सातत्याने सुरू आहे. अमृत भारत स्थानक या उपक्रमाअंतर्गत बारामती–फलटण–लोणंद या नवीन मार्गाच्या प्रकल्पाची उल्लेखनीय प्रगती, पुणे जंक्शनवरील पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मोठ्या कामांचा समावेश आहे.
बारामती–फलटण–लोणंद (६४ किमी) हा नवीन मार्ग प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबवला जात आहे. लोणंद–फलटण विभाग (३८ किमी) हा याअंतर्गतचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यासाठी,२००२ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा मार्ग पूर्ण होऊन कार्यान्वित झाला आहे. तर फलटण–बारामती विभाग (२६ किमी) हा दुसरा टप्पा २०१६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. या टप्प्याच्या मार्गिकेच्या बाबतीत सुरुवातीला विरोध झाला, मात्र त्यानंतर राज्य सरकार आणि भागधारकांशी चर्चा करून मार्गाचे पुनरावलोकन करण्यात आले. यानंतर मार्गिकेविषयी अंतिम निर्णय घेतला गेला आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात केली गेली. यासोबतच जमीन अधिग्रहणासाठी सप्टेंबर २०२२ मध्ये हा प्रकल्प विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आणि त्याच महिन्यात जमीन अधिग्रहणासाठी सक्षम प्राधिकरणाची स्थापना आणि नियुक्तीही करण्यात आली. आता आवश्यक असलेल्या २६२ हेक्टर जमिनीपैकी २४० हेक्टर जमीन अधिग्रहित झाली आहे, आणि उपलब्ध जमिनीवर बांधकाम सुरू झाले आहे.
अमृत भारत स्थानक या प्रकल्पांतर्गत आता नवी बारामती इथे एक मालधक्का उभारला जात असून, तो स्थानिक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या मालधक्क्यामुळे कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होणार आहे. तर पुणे–सातारा विभागावरील लोणंद जंक्शन इथेही जोडणी उपलब्ध करून दिली गेल्यामुळे पुणे आणि साताऱ्याच्या दिशेने होणारी प्रवासी आणि मालवाहतूक जोडणीही मजबूत होणार आहे.
पुणे जंक्शन हे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकासासाठी निश्चित केलेल्या स्थानकांपैकी एक आहे. पुणे जंक्शन रेल्वे स्थानकावर चार उद्वाहने, मुख्य आणि दुय्यम अशा दोन्ही प्रवेशद्वारांच्या परिसरातील सुधारणा आणि फलाटांचा विस्तार करण्याची कामे सुरू आहेत. अशातच आता इथे एका अतिरिक्त फलाटाची तरतूद आणि विद्यमान फलाटांचा विस्तार या कामांसह यार्ड पुनर्रचनेच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. शिवाय पुणे जंक्शन रेल्वे स्थानकावर सहज उपलब्धता, परिसर, स्थानक इमारती, प्रतीक्षागृह, शौचालये, आसन व्यवस्था, पाण्याची केंद्रे, पादचारी पूल, सभागृह, उद्वहन, एस्केलेटर, रॅम्प, फलाटांचे पृष्ठभाग, प्रवासी माहिती प्रणाली, वाहनतळ, बहु-आयामी एकात्मता, दिव्यांगजनांसाठी सुविधा, आणि एक स्थानक एक उत्पादन अंतर्गत स्थानिक उत्पादनांसाठीच्या व्यावसायिक केंद्रांची तरतूद अशा सुधारणा केल्या जाणार आहेत.
देशभरात या योजनेअंतर्गत १३३७ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातील १३२ स्थानके आहेत. यात अहिल्यानगर , अजनी, अकोला, अंधेरी, वांद्रे टर्मिनस, भुसावळ, चंद्रपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे), दौंड, देहू रोड, गोंदिया, जळगाव, कल्याण, कुर्ला, लोणावळा, मुंबई सेंट्रल, नाशिक रोड, पनवेल, पुणे जंक्शन, सोलापूर, ठाणे आणि वाठार यांसारख्या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत आमगाव, चांदा किल्ला, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड, वडाळा रोड, बारामती आणि नांदुरा या १७ स्थानकांवरील कामे पूर्ण झाली आहेत तर इतर स्थानकावरील कामांची चांगल्या गतीने प्रगती होत आहे.
पुण्यासाठी सध्या २६९ नियमित रेल्वे सेवा सुरू आहेत, ज्यामध्ये २०२४-२५ आणि २०२५-२६ (नोव्हेंबर २०२५ पर्यंत) दरम्यान सुरू केलेल्या १२ सेवांचा समावेश आहे. यामध्ये मुझफ्फरपूर-हडपसर एक्सप्रेस, पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस, रेवा-हडपसर एक्सप्रेस, जोधपूर-हडपसर एक्सप्रेस, कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस आणि हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस. तसेच १६४ वंदे भारत खुर्ची वाहन सेवा कार्यरत आहेत.
हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर फलाट १ वरील रेल्वेगाडी जल आपूर्ती प्रणाली आणि प्रतीक्षालयातील सुधारणा पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत निवडल्या गेलेल्या १३२ स्थानकांमध्ये हजूर साहिब नांदेडचाही समावेश आहे, ज्याचे मोठे नियोजन सध्या सुरू आहे.
नांदेड जंक्शन दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येते, ज्याला २०२५-२६ साठी योजना शीर्षक-५३अंतर्गत ८६३ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. इतर प्रमुख स्थानकांप्रमाणे नांदेड येथील पुनर्विकास हा मंजुरी, तांत्रिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता यावर अवलंबून असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने होईल. यासंबंधी सविस्तर माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.