
जम्मू-काश्मीरच्या पहलगान येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी या पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यातील मृतांमध्ये ६ महाराष्ट्रातील नागरिकांचा देखील समावेश आहे. या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना शौर्य पुरस्कार देण्यात यावेत अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात सुप्रिया सुळे यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील ६ व्यक्तींच्या कुटुंबीयांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी सुद्धा मागणी या पत्राद्वारे सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिच्या नावाचा देखील उल्लेख सुप्रिया सुळे यांनी या पत्रात केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, 'जम्मू काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरीकांची हत्या करुन दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये राहणारे संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने हे तिघे जण, पनवेल येथे राहणारे दिलिप देसले, पुण्यामध्ये राहणारे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे मरण पावले. या घटनेमुळे देशातील जनमानस शोकसंतप्त आहे. ही घटना भारतीयत्वावर हल्ला असून या दहशवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी नागरीक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत.'
पहलगाम हल्ल्याबद्दल एकून अंगाचा थरकाप उडतो असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुढे लिहिले की, 'या घटनेचे वृत्तांत ऐकूनच अंगाचा थरकाप उडतो मग प्रत्यक्ष अनुभवलेल्या नागरीकांची काय स्थिती असेल याची कल्पनाही करवली जात नाही. आपल्या घरातील कर्त्या पुरुषांना दहशतवादी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबियांनी या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना केला. या संपूर्ण घटनेत त्यांनी दाखविलेली हिंमत अतिशय मोलाची आहे. आपली जीवाभावाची माणसं डोळ्यांदेखत मारली जात असताना अशी हिंमत दाखविणे सोपे नाही.'
महाराष्ट्रातील ६ कुटुंबांना शौर्य पुरस्कार द्यावा अशी मागणी करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'म्हणूनच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ६ जणांच्या कुटुंबीयांना या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'नागरी शौर्य' पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या घटनेत या कुटुंबांनी जे गमावले याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही पण तरीही या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे. स्व. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी या उच्चशिक्षित असून त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येणे शक्य आहे.'
तसंच,'याच धर्तीवर इतर पिडीतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेता येईल. या कृतीद्वारे या शूर कुटुंबियांना महाराष्ट्रातील जनता सदैव आपल्यासोबत उभी आहे असा विश्वास शासनाने द्यावा ही नम्र विनंती. मला खात्री आहे की महाराष्ट्र शासन या विनंतीचा नक्कीच विचार करुन त्यावर सकारात्मक निर्णय जाहीर करेल.', असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.