Summary -
मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले.
चेंबूर पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी जमा झाले.
अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद केला.
रेल्वे आण रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम.
मुंबईला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी.
मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईतील रस्ते, रहिवासी ठिकाणं पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. या पावसाचा फटका रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मुंबईतल्या चेंबूरमधील पालिका रुग्णालय परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे.
चेंबूरमध्ये श्रीमती दिवालीबेन मोहनलाल मेहता या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयामध्ये पाणी साचले आहे. रुग्णालयाच्या बाहेर तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांचे हाल होत आहे. रुग्णांना रुग्णालयामध्ये खांद्यावर घेऊन जावे लागत आहे. या पाण्यातून कशी तरी वाट काढत जावे लागत असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये संरक्षण भिंत कोसळून घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली. चेंबूरमधील अशोकनगर भागात संरक्षण भिंत कोसळून ७ झोपड्यांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही. या घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबांची तात्पुरत्या स्वरूपात मरवली चर्चमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईला २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहण्याचे आवाहन पालिकेकडून केले जात आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पावसाचा मोठा फटका पूर्व द्रुतगती मार्गाला बसला आहे. घाटकोपर ते चुनाभट्टीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जोरदार पाऊस यामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. या पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर पाणी साचून एकाच ठिकाणी प्रवासी अडकले आहेत.
अंधेरी परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा रस्ते जलमय झाले आहेत. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी सब वे बंद करण्यात आला आहे. याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर अंधेरीतील के पश्चिम वॉर्डमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने संताप व्यक्त केला आहे.
मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. या पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या माटुंगा आणि माहीम रेल्वे स्थानकादरम्यान रूळावर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.