मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने गाड्या उशिराने धावत
मुंबईत रेड अलर्ट, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर आज पावसाने अक्षरशः सलामी दिली आहे. काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबईला आज रेड अलर्ट दिला असून पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सरासरी अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. सायन आणि दादर परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे गाड्यांची गती मंदावली आहे. काही ठिकाणी पाणी रुळावर साचल्याने प्रवाशांना स्थानकांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आले असून, वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी व घाटमाथ्याच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त ठिकाणी जाऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेने आणि स्थानिक प्रशासनाने पाणी साचलेल्या ठिकाणी पंपिंगच्या हालचाली सुरू केल्या असून, आपत्कालीन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.