
मुंबई आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.
मुंबईला ऑरेंज अलर्ट, तर पुणे-सातारा-कोल्हापूरला रेड अलर्ट.
वाहतुकीवर पावसाचा फटका; एक्स्प्रेसवेवर ट्रॅफिक जाम.
रेल्वे सेवा उशिरा धावत असून पावसाचा तडाखा राज्यभर सुरू.
मुंबईसह पश्चिम उपनगरांत पहाटेपासूनच मुसळधार पावसाची सुरूवात झाली आहे. संततधारेमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे यांसह पश्चिम उपनगरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्यानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील तीन तास अतिशय धोकादायक मानले जात आहेत.
आज आठवड्याचा पहिला दिवस असून, पहाटेपासूनच पावसाचा जोर कायम आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून, त्यासोबत पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या प्रभावामुळे संपूर्ण राज्यभर पावसाचा जोर वाढल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं.
संततधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबईतील कामगारांना बसत आहे. एक्सप्रेसवेवर ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईची लोकल देखील उशीरानं धावत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिरानं, हार्बर रेल्वे ५ मिनिटं, तर पश्चिम रेल्वे सुरळित सुरू आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.
पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण तसेच परिसरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.