mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra apply online : ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद झाली आहे का? असा सवाल राज्यातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्याला कारणही तसेच आहे, मागील दीड वर्षांपासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या वृद्ध नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील याचं प्रमाण तब्बल ६०० पेक्षा जास्त आहे, दीड दोन वर्षानंतरही वद्धांना या योजनेतून तीर्थदर्शनाला जाता आलेले नाही. सकाळ वृत्तपत्रात याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने १४ जुलै २०२४ रोजी ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली होती. निवडणुकीआधी योजना सुरू झाल्यानंतर अनेकांना याचा लाभ मिळाला. अनेक जेष्टांनी देव दर्शन केले. पण सध्या या योजनेसाठी सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळत आहे. राज्य सरकारने योजना बंद झाली की सुरूच आहे, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण या योजनेसाठी आता अर्जही करता येत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. सोलापूरमधील तब्बल ६०० जणांनी या योजनेतून लाभ घेण्यासाठी दीड वर्षांत अर्ज केले, पण त्यांना अजूनही योजनेतून तीर्थदर्शनाला जाता आलेले नाही. यामधील अनेकांनी आता आशा सोडून दिलेली असेल.
चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, १२ ज्योतिर्लिंग दर्शन, अमरनाथ यात्रासह अन्य धार्मिक स्थळाला आयुष्यात एकदा तरी जाऊन दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. जबाबदारी, काम आणि पैशांच्या चणचणीमुळे तारूण्यात अनेकदा हवं तिथं दर्शन करण्यासाठी जाता येत नाही. पण सरकारच्या या योजनेनंतर उतारवयात अनेकांच्या इच्छा जागृत झाल्या. त्यांनी दर्शनासाठी अर्जही केले. पण त्यांना आता प्रतिसाद मिळत नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री तीर्थदर्शन ही योजना जोमात सुरू होती. पण सध्याच्या परिस्थितीत अर्ज केलेल्या प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठांना अद्याप तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी वाटच पहावी लागत आहे. त्यात सोलापूर, बीड, कोल्हापूर, लातूर, सांगली, सातारा, नागपूरसह राज्यातील अनेक लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांकडूनही या योजनेबद्दल काहीही माहिती देण्यात येत नाही.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नेमकी कशी आहे ?
महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना या योजनेचा लाभ घेता येतो. पण त्यासाठी त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे लागते. राज्यातील गोरगरिबांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली होती. १४ जुलै २०२४ रोजी याबाबतचा जीआर निघाला होता. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १६१ आणि देशातील ८८ तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देता येणार होत्या. त्यासाठी प्रत्येकाचा ३० हजार रूपयांचा खर्च सरकारकडून केला जातो. संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे यासाठी अर्ज करावा लागतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.