Ashish Deshmukh, Congress
Ashish Deshmukh, Congress saam tv
महाराष्ट्र

Ashish Deshmukh Statement: राहुल गांधींना 'ती' ऐतिहासिक चूक दुरुस्त करता आली असती, काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर आशिष देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

संजय डाफ

Congress News: ओबीसींच्या कल्याणसाठी आवाज उठवला म्हणून आपल्याला काँग्रेस नेत्यांनी पक्षातून काढले. काँग्रेस पक्षातील ओबीसी नेत्यांची वागणूक उच्चवर्णीयांसारखी झाल्याचे डाॅ. आशिष देशमुख (ashish deshmukh) यांनी म्हटलं आहे. पक्षविराेधी कारवाया तसेच पक्षनेतृत्वाच्या विराेधात विधान केल्याने देशमुख यांना काॅंग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईवर देशमुख म्हणाले ही कारवाई जाणूनबजुन केली गेली आहे. या विरोधात काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडे दाद मागण्यात काही अर्थ आहे असे वाटत नाही. वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी दिशाभूल करून ठेवली आहे असंही देशमुखांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)

डॉ. आशिष देशमुख म्हणाले, “निष्कासनाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व चुकीच्या लोकांकडे असल्याचे द्योतक आहे. ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल मला काँग्रेस नेत्यांनी पक्षातून काढले. मला त्यांनी कारणे दाखवा नोटिस दिली होती. त्यावर मी सविस्तर उत्तर दिले होते.

महाराष्ट्रासह देशभरातील माध्यमांनी माझे उत्तर सविस्तर प्रसिद्ध केले. त्यात काही तथ्य होते म्हणूनच त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली. मात्र, माझे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना समाधानकारक वाटत नाही, एवढेच कारण त्यांनी निष्कासनासाठी दाखविले आहे असेही देशमुख यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ मला पक्षातून काढण्याचे आधीच ठरले होते आणि नोटिस नंतर दिली गेली असाही निष्कर्ष काढता येतो.

देशमुख पुढे म्हणाले काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या लोकशाहीसाठी, एकात्मतेसाठी बलिदान दिले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मात्र स्वातंत्र्य, लोकशाही असे काहीही मानत नाहीत. त्यांना जो आवडत नाही, त्याला ते दूर करतात.

मी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उठवत असल्यामुळे स्वतःला ओबीसी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांची अडचण होत होती. आशिष देशमुखांचे पक्षातील वजन वाढले तर आपले वजन कमी होईल, असे या दुकानदार नेत्यांना वाटत होते. माझा गुन्हा कोणता, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.

राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी सूचना मी केली. काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असेल तर ही सूचना लोकतांत्रिक आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा पक्ष लोकशाहीवादी नसल्याचे सिद्ध करण्याची घाई झालेली दिसते असेही देशमुख यांनी म्हटलं.

देशमुख पुढे म्हणाले माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत हे खरे आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद व मंत्रिपदे भूषविली. त्यामुळे माझा ओढा त्या पक्षाकडे असणे स्वाभाविक होते. पण, काँग्रेसमध्ये डोके आणि वाणी वापरणारे लोकं चालत नाहीत, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा मी त्या पक्षापासून दूर झालो.

सन 2014 मध्ये भाजपाकडून निवडणूक लढलो व जिंकलो. पण, काँग्रेसबद्दलची आस्था संपलेली नव्हती. त्यामुळे राहुलजी, सोनियाजी यांच्याशी बोलून मी पुन्हा काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेससाठी आमदारकी सोडणारा मी एकमेव आहे. ओबीसींसाठी मला काम करायचे आहे, असे मी त्यांना पक्षात परत येताना म्हणालो होतो आणि त्यांनी काँग्रेसमध्ये राहून तुम्हाला ते करता येईल, असे म्हटले होते. पण, महाराष्ट्रातील नेत्यांनी श्रेष्ठींच्या भावनेची किंवा काँग्रेस पक्षाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या मुद्यांची देखील दखल घेतली नाही.

काँग्रेसमध्ये परतल्यावर मला सातत्याने डावलले गेले. काँग्रेसमध्ये ओबीसी समाजाचे जे प्रस्थापित नेते आहेत, त्यांची मानसिकता उच्चवर्णीयांसारखी झाली आहे. त्यांना ओबीसींचे खरे प्रश्न हाताळण्यापेक्षा ओबीसींच्या मतांशी देणेघेणे आहे. मात्र, ओबीसी लोकांनी काँग्रेसचा कावा ओळखला आहे. एकेकाळी काँग्रेसचा बेस असलेला ओबीसी मतदार काँग्रेसपासून दूर गेला असून, काँग्रेसच्या घसरणीचे ते प्रमुख कारण आहे असेही देशमुखांना म्हटलं आहे.

मात्र, यातून कोणताही बोध घेण्यास काँग्रेसचे नेते तयार नाहीत. भविष्यात मला ओबीसींच्या, शेतकऱ्यांच्या व युवकांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय घेतलेला नाही. योग्यवेळी सर्वांना कळेल. मी कुण्या नेत्याकडे गेलो किंवा माझ्याकडे कुणी आलो म्हणजे मी त्यांच्या पक्षात जाणार, असा अर्थ काढण्याची घाई करू नका. राजकारणाच्या पलिकडे देखील काही संबंध असतात आणि ते जपावे लागतात. एकमेकांवर टीकाटिप्पणी करून देखील मैत्री भाव जपण्याची राजकारणातल्या बऱ्याच लोकांमध्ये पद्धत आहे. दुर्दैव असे की, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ही दिलदारी नाही. त्यांना त्यांच्यावरची टीका आवडत नाही.

ओबीसींशी काँग्रेसची कोणतीच बांधिलकी राहिली नाही

ओबीसींच्या मुद्यांवर मी आवाज उठवला तर ते देखील आवडत नाही. मी लोकतांत्रिक पद्धतीने काही मुद्दा मांडला तर ते देखील आवडत नाही. थोडक्यात त्यांना आशिष देशमुख आवडत नाही. कारण आशिष देशमुख हा ओबीसींचा खरा प्रतिनिधी आहे, हे त्यांना माहिती आहे आणि तो आपल्याला वरचढ होऊ शकतो हेही त्यांना माहिती आहे.

या कारवाईच्या विरोधात काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडे दाद मागण्यात काही अर्थ आहे, असे वाटत नाही. त्यांची देखील महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी दिशाभूल करून ठेवली आहे. ज्या ओबीसी समुदायाच्या पाठिंब्यावर ज्या काँग्रेसने या देशात सहा दशकांहून अधिक काळ राज्य केले, त्या ओबीसींशी आता काँग्रेसची कोणतीच बांधिलकी नाही, हे दुःखदायक आहे.

ऐतिहासिक सत्य काँग्रेस विसरत आहे...

एक ऐतिहासिक सत्य काँग्रेसचे नेते विसरत आहेत. राहुल गांधी यांनी ओबीसी समुदायाचा अवमान केला, हा जो आरोप त्यांच्यावर लागला, ती अलिकडची गोष्ट आहे. मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना राहुलजींचे पिताश्री राजीव गांधी यांनी विरोध केला होता. 1990 च्या आसपासची ही घटना आहे. काँग्रेसचा ओबीसी जनाधार तेव्हापासून वेगाने कमी झाला. आणि आज त्या काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था झालेली आहे.

राहूल गांधींना विषय संपवता आला असता...

देशमुख पुढे म्हणाले ओबीसी समाजाची माफी मागून राहुलजींना (rahul gandhi) ताजा विषय संपविता आला असता आणि त्यांच्या पिताश्रींनी केलेली ऐतिहासिक चूक देखील काही प्रमाणात दुरुस्त करता आली असती. ओबीसी समुदायाशी नाळ तोडणे हे भारताच्या आत्मतत्त्वाशी नाळ तोडण्यासारखे आहे. काँग्रेसची पिछेहाट त्यामुळेच सुरू आहे.

काँग्रेसने आपल्या मूळ जनाधाराशी पुन्हा संबंध प्रस्थापित करावेत, असे मला वाटले. त्यामुळे मी राहुलजींना ओबीसींची माफी मागण्याची सूचना केली तर मलाच पक्षातून काढून टाकले. ओबीसी समुदायाशी असलेली नाळ तोडल्यामुळे काँग्रेसच्या सत्तेला ग्रहण लागले. त्यानंतर परिस्थिती इतकी बदलली की, केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची विरोधी बाकावरची उपस्थिती देखील जेमतेम शिल्लक राहिलेली आहे. कारण काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्षांनी घेतलेली आहे.”

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relation Tips: नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी करा 'या' नियमांचे पालन

Health Tips: दुधासोबत या गोष्टी खाऊ नये,आरोग्य बिघडेल

Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Adani Group News: अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं काय आहे कारण?

Today's Marathi News Live : नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, गणेश नाईक देखील उपस्थित असणार

SCROLL FOR NEXT