नवी दिल्ली : डीबीएस बँक इंडियाच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमचं खाते डीबीएस बँकेत असेल, तर आता खात्यात एक ठराविक रक्कम ठेवणे अनिवार्य असणार आहे. बँकेचा हा नवा नियम १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. बँकेने ही माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.
बँकेनुसार, बचत खात्यात किमान १०,००० रुपये ठेवणे आवश्यक असेल. जर खात्यात ही रक्कम नसेल, तर खातेदाराला ६ टक्के दंड भरावा लागेल. मात्र, दंडाची रक्कम ५०० रुपयांपेक्षा अधिक असणार नाही.
डीबीएस बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएसद्वारे याबाबत माहिती दिली आहे. या एसएमएसमध्ये स्पष्ट केले आहे की, १ ऑगस्ट २०२५ पासून महिन्याला खात्यातील सरासरी रक्कम १०,००० रुपयांपेक्षा कमी असेल, तरीही ६ टक्के दंड आकारला जाईल. परंतु हा दंड ५०० रुपयांपेक्षा जास्त आकारला जाणार नाही.
बँकेच्या म्हणण्यानुसार, वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांवर वेगवेगळा दंड आकारण्यात येईल. याबाबत अधिक सविस्तर माहिती बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. याशिवाय, १ मेपासून डीबीएस बँकेच्या एटीएम व्यवहारांमध्येही बदल करण्यात आलाय. मोफत व्यवहारांच्या मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांना यास परवानगी दिली आहे.
बँकेकडून मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारासाठी कमाल २३ रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच, नॉन-डीबीएस बँक एटीएममधून मोफत मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यासही २३ रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल, असे डीबीएस बँकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, डीबीएस बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावर कोणतंही शुल्क लागू करण्यात आलेलं नाही. तुम्ही डीबीएस बँक खात्यातून कितीही वेळा पैसे काढू शकता. तसेच तुमचं डीबीएस बँकेत खाते असेल, तर या बदलाबाबत माहिती असायला हवी. त्याचबरोबर खातेदारांनी खात्यात किमान रक्कम ठेवणे अनिवार्य असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.