
विराट कोहली आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याचा दावा
आरसीबीतील संघ सहकाऱ्याच्या दाव्यानं खळबळ
आयपीएल खेळणं कधी बंद करणार हे स्वतः विराटनं सांगितलं
दिग्गज खेळाडू विराट कोहली यानं टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वनडे क्रिकेटमधूनही आता तो निवृत्त होणार असल्याची क्रिकेटविश्वात चर्चा आहे. पण याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. त्याचवेळी विराट कोहलीच्या रिटायरमेंटबाबत आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. विराट कोहली आयपीएलही खेळणार नसल्याचं आरसीबी संघातील त्याच्या सहकाऱ्यानं सांगितलं.
विराट कोहलीचा चाहतावर्ग मोठा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्यानं खेळतच राहावं, असं त्याच्या चाहत्यांना वाटतंय. विराटनं अलीकडेच कसोटी क्रिकेटला रामराम केलाय. त्याआधी त्यानं टी २० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताचा हा दमदार खेळाडू आता केवळ वनडे क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
आयपीएलमध्ये तो आरसीबी संघाकडून खेळतोय. जेव्हापासून आयपीएलला सुरुवात झालीये, तेव्हापासून तो या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. पण आता तो आयपीएलमधूनही खेळणार नसल्याचं वृत्त येऊन धडकलंय. मागच्या वर्षीच्या स्पर्धेवेळी विराट कोहलीने त्याच्या एका संघ सहकाऱ्याला ही बाब सांगितली होती. आयपीएलमध्ये खेळणार नाही असंही तो त्या सहकाऱ्याला म्हणाला होता. आरसीबीचा खेळाडू स्वास्तिक चिकारानं याबाबत दावा केला आहे.
रेवस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आरसीबीकडून खेळणारा स्वास्तिक चिकारा यानं विराट कोहली नेमका काय म्हणाला होता हे सांगितलंय. आयपीएल २०२५ दरम्यान विराट म्हणाला होता की, जोपर्यंत मी संपूर्णपणे फिट आहे, तोपर्यंत क्रिकेट खेळणार आहे. इम्पॅक्ट खेळाडूसारखा खेळणार नाही. वाघासारखं खेळणार आहे. मी पूर्ण २० षटके फिल्डिंग करून फलंदाजी करायलाही जाणार. ज्या दिवशी मी इम्पॅक्ट खेळाडूसारखा खेळेल, त्या दिवशी मी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल असे विराट म्हणाल्याचं स्वास्तिकने सांगितले.
विराट कोहलीने या मोसमात खूपच चांगली कामगिरी केली होती. आयपीएल २०२५ मध्ये त्याने ६०० हून अधिक धावा केल्या. आरसीबीने विजेतेपद जिंकलं. त्यात विराट कोहलीचा मोठा वाटा आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून विराट अव्वल आहे. या स्पर्धेत तो आतापर्यंत २६७ सामने खेळला आहे. त्यात ३९.५५ च्या सरासरीने १३२.८६ च्या स्ट्राइकने ८६६१ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आठ शतके आणि ६३ अर्धशतके केली आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ही ११३ आहे.
आयपीएल २०२५ चे विजेतेपद आरसीबीनं पटकावलं. त्यात विराट कोहलीचं योगदान मोठं आहे. आरसीबीनं पहिल्यांदाच आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. या मोसमात त्यानं १५ सामन्यांत ५४.७५ च्या सरासरीने ६५७ धावा केल्या होत्या. त्याचा बेस्ट स्कोअर नाबाद ७३ धावा होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.