
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी टीम इंडिया सिलेक्शनवरून वाद
श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वालला स्थान न मिळाल्यानं नाराजी
माजी खेळाडूनं केले गौतम गंभीरवर आरोप
आशिया चषक २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होण्याच्या आधीपासूनच या स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचं कारणही तसंच आहे. ही स्पर्धा कुठे खेळवली जाणार इथपासून ते भारत-पाकिस्तान सामना आणि आता ती भारतीय संघ निवड आणि गौतम गंभीरसह निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यापर्यंत ही चर्चा येऊन ठेपलीय. आता तर टीम इंडियाच्या निवडीवरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावरच गंभीर आणि खळबळजनक आरोप होत आहेत. श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वालला संघात न घेतल्यानं माजी खेळाडूनं गंभीरला लक्ष्य केलं आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा झाली. त्यात स्फोटक फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि संयमी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलं नाही. यामुळं अनेक दिग्गज खेळाडू आणि भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या दोन खेळाडूंना संघात न घेतल्यानं माजी खेळाडू सदागोपन रमेशनं गंभीरवर आरोप केलाय. जे खेळाडू आवडीचे आहेत, त्यांनाच गंभीर संघात संधी देतो, असा आरोप रमेशनं केलाय. गौतम गंभीरचं सर्वात मोठं यश हे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आहे आणि याच स्पर्धेत श्रेयस अय्यरनं कमालीचा खेळ केला होता, असंही त्यानं सांगितलं.
जे आवडते खेळाडू आहेत, त्यांनाच गौतम गंभीर पाठिंबा देतो. पण जे आवडते नाहीत, त्यांना वाऱ्यावर सोडतो. इंग्लंडविरुद्धची मालिका अनिर्णित राखली हे एक मोठं यश मानलं जातं, कारण मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियानं खराब कामगिरी केली होती. विदेशात मालिका विजयाची सुरुवात ही विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी केली होती. आता इंग्लंडमध्ये कसोटी मालिका अनिर्णित राखली याकडं मोठं यश म्हणून बघितलं जातं, याकडंही रमेशनं लक्ष वेधलं.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता ठरला. हे गौतम गंभीरचं मोठं यश मानलं जातंय. पण त्यात श्रेयस अय्यरचं योगदान मोठं होतं. तरीही गौतम गंभीर त्याला पाठिंबा देत नाही. यशस्वी जयस्वालसारखे खेळाडू हे एक्स फॅक्टर ठरतात. अशा खेळाडूंना कधी-कधी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी द्यायला हवी. त्याला स्टँडबाय ठेवणं खूपच चुकीचं आहे. अय्यरला तर व्हाइट बॉल संघात कायम ठेवलं पाहिजे. खेळाडूंना पाठिंबा द्यायला हवा कारण त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि ते फॉर्मात सुद्धा राहतील, असंही रमेशनं सूचवलं.
श्रेयस अय्यरनं अलीकडच्या काळात केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यानं आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचं नेतृत्व केलं होतं. कर्णधारपदासोबत त्यानं फलंदाजीतही चांगली कामगिरी केली होती. १७ सामन्यांत त्यानं ५० पेक्षा जास्त सरासरीनं ६०४ धावा केल्या होत्या. अय्यरची वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या नाबाद ९७ होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.