

क्रिकेटविश्वाला आणि क्रिकेटच्या विश्वातील महान खेळाडूंनाही टीम इंडियाच्या एका निर्णयानं आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला आहे. कोट्यवधी क्रिकेट चाहते वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची उत्सुकतेने वाट पाहत होते, पण त्यांचा टीम इंडियाच्या निर्णयाने भ्रमनिरास झाला. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात पदार्पण करेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला खेळताना बघायला मिळेल अशी कोट्यवधी चाहत्यांची अपेक्षा होती. पण प्लेइंग ११ मध्ये वैभवचं नाव नसल्यानं त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. वैभव सूर्यवंशीला पदार्पणासाठी आणखी काही वेळ वाट बघावी लागणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यर यानं यामागचं कारणही सांगितलं आहे.
बेलफास्टमध्ये टॉस जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर यानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघातील बरेचसे खेळाडू पहिल्यांदाच या मैदानात आणि अशा वातावरणात खेळणार आहेत. त्यामुळे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याचा पर्याय निवडला, असं श्रेयसनं सांगितलं. त्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत प्रश्न विचारला असता, त्यानं वैभवचं भरभरून कौतुक केलं. मात्र, त्याला काही वेळ वाट बघावी लागणार आहे, असंही सांगितलं.
दुर्दैवाने वैभव सूर्यवंशी या सामन्यात खेळू शकत नाही. तो गन प्लेअर आहे. मात्र, आमच्याकडे खूपच अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी गेल्या काही काळात भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. सध्या तरी त्यांच्यावरच विश्वास ठेवला आहे. त्यांनी संपूर्ण मोसमात चांगला खेळ केला आहे. वैभवला योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच संधी मिळेल, असे श्रेयस म्हणाला.
संघ व्यवस्थापन सध्या अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देणार असल्याचे श्रेयस अय्यरच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. तर वैभव सूर्यवंशीकडे भविष्य म्हणून बघितले जात आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने खेळाडूंना आपल्या खेळावर भरवसा ठेवा आणि नीडरपणे खेळा अशा सूचना दिल्याचेही श्रेयस अय्यरने सांगितले.
स्वतःवर विश्वास ठेवा, असे गौतम गंभीरने खेळाडूंना सांगितले आहे. स्वतःचा नैसर्गिक खेळ करा. मैदानात उतरल्यानंतर बिनधास्तपणे खेळा. कुठलीही भीती मनात नको. परिस्थितीशी लवकरात लवकर जुळवून घ्या आणि त्यासाठी आपण चांगला सरावही केला आहे, अशा सूचनाही गंभीरने दिल्याचे श्रेयस म्हणाला.
आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. अंतिम लक्ष्य मोठं आहे, पण आमचे संपूर्ण लक्ष आयर्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत चांगली कामगिरी करण्यावर असेल, असेही श्रेयस अय्यरने सांगितले. कर्णधारपदाच्या शैलीबाबतही श्रेयस अय्यरने स्पष्ट मत व्यक्त केले. सर्व गोष्टी सोप्या करून घ्या असा सल्ला मी नेहमी खेळाडूंना देतो. क्रिकेटला अधिक क्लिष्ट करण्याची आवश्यकता नाही असे मी नेहमी म्हणतो. वर्तमानकाळात राहा. खेळाचा आनंद लुटा आणि आपला सर्वोत्तम खेळ करा. हे सगळ्यात महत्वाचे आहे, असेही श्रेयस म्हणाला. पुढील सामन्यात तरी वैभवला संधी मिळेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.