

देशाचे पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षाचे दिग्गज नेते, विरोधी पक्षनेते प्रचारात उतरल्यानं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. त्याचवेळी बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत असताना, पुन्हा पश्चिम बंगाल (West Bengal Election Voting) चर्चेत आलं आहे. अनेक बूथवरील ईव्हीएमवर टेप लावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आरोपात तथ्य असेल तर संबंधित ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदार सकाळपासून गर्दी करत आहेत. त्यावेळी डायमंड हार्बर मतदारसंघातील फलतामध्ये केंद्रावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. (west bengal voting evm tape controversy) अनेक ठिकाणी हिंसा आणि गडबड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. डायमंड हार्बरच्या फलता मतदारसंघातील अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवरील ईव्हीएमवर भाजपच्या चिन्हासमोर टेप लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची गंभीर दखल मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार अग्रवाल यांनी घेतली आहे. ज्या मतदान केंद्रांवर ईव्हीएमवर काळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे टेप लावण्यात आल्याचे आढळून आले आहे, त्या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारच्या तक्रारी जास्त असल्यास संबंधित विधानसभा मतदारसंघातच पुन्हा मतदान घेतलं जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनेक मतदान केंद्रांवर भाजपच्या चिन्हासमोर टेप लावून मतदान करण्यापासून रोखलं जात आहे. मतदारांना पर्याय निवडण्यापासून रोखण्यात येत आहे. हे डायमंड हार्बर मॉडल आहे. याच माध्यमातून ममता बॅनर्जींनी अभिषेक बॅनर्जी यांना लोकसभा निवडणूक जिंकण्यात मदत केली होती, असा आरोप अमित मालवीय यांनी केला होता. फलतामधील ज्या केंद्रांवर अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, त्या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून केली आहे.
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसनेही भाजपवर आरोप केले आहेत. अमित शहांची केंद्रीय सुरक्षा दले आता दिवसाढवळ्या महिलांवर निर्दयीपणे हल्ले करत आहेत. त्यांना मारहाण केली जात आहे. निष्पाप मतदार, विशेषतः महिलांना मारहाण केली जात आहे. दहशत माजवली जात असून, भीती दाखवली जात आहे. आमच्या माता-भगिनींवर जितके हल्ले कराल, तेवढा आमचा विरोध तीव्र होईल. बंगालच्या महिलांचा अपमान, लाठीचार्ज, त्यांच्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाची किंमत भाजपला चुकवावी लागेल. ४ मे रोजी बंगाल त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.