

तेलंगणाच्या राजकारणात मोठी घडामोड
कोंडा सुरेखा यांची तेलंगणा मंत्रिमंडळातून हकालपट्टी
मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून हटवलं
रेवंत रेड्डींनी राज्यपालांना कोंडा सुरेखांबाबत पत्र पाठवलं
कोंडा सुरेखा यांच्या मुलीच्या वक्तव्यामुळे राजकारण तापले
तेलंगणाच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी मोठा निर्णय घेतला. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री कोंडा सुरेखा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. कोंडा सुरेखा यांचे मंत्रिपद काढून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या संदर्भात राज्यपाल शिव प्रताप शुल्का शिफारस पाठवण्यात आली आहे. कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
तेलंगणाच्या वनमंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. समितीने अलीकडील वादग्रस्त वक्तव्यांबद्दल मंत्री सुरेखा यांच्या मुलीवर कारवाई करण्याची शिफारस केली होती. कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याव्यतिरिक्त समितीने चिन्ना रेड्डी यांना नियोजन मंडळातून काढून टाकण्याचीही शिफारस केली होती. चिन्ना रेड्डी यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी गडवाल विजयलक्ष्मी यांच्याकडे तेलंगणा नियोजन मंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोंडा सुरेखा यांनी सांगितले की, त्यांनी पक्षाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले होते. त्यांच्या मुलीच्या वक्तव्यांसंदर्भात त्यांच्या भूमिकेचा योग्य विचार केला गेला नाही, असा दावा त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या की, 'पक्षातील कुणीही माझ्याशी संपर्क साधला नाही.' सुरेखा यांनी निर्णयाची माहिती देणाऱ्या पत्राच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कारण त्यावर सही किंवा अधिकृत लेटरहेड नव्हते. शिस्तभंगाची कारवाई करण्यापूर्वी पक्षाने त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते, असा युक्तिवाद त्यांनी केला.
ऑगस्ट महिन्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात कोंडा सुरेखा यांची मुलगी कोंडा सुष्मिता पटेलने रेवंत रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केली होती. या टीकेनंतर सुरेखा यांच्यावर टीकास्त्र सुरू झाले. त्यावेळी, मंत्री सुरेखा यांनी आपल्या मुलीची मते वैयक्तिक असून तिला जबाबदार धरू नये असे म्हटले होते. पण काँग्रेसच्या आमदारांनी विशेषतः मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या गटातील आमदारांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.