

कोलकात्यातील तारातला परिसरात बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण गोदाम दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. बांधकामाधीन गोदामाचं छत अचानक कोसळल्याने आत काम करणारे अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आणि मोठा जीवितहानीचा प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत मृतांची संख्या वाढून नऊ झालीये. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेत सुमारे 20 कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलीये. यामध्ये गोदामाचा मालक शंभू बेहरा याचाही समावेश आहे. सुपरवायझर सय्यद मोहम्मद गुलजार, मजूर पुरवठादार मोहम्मद अताउल आणि सुभाष चौधरी यांनाही अटक करण्यात आलीये. तर ठेकेदार मोहम्मद असगर याच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून निष्काळजीपणा आणि बांधकामातील त्रुटी यावर लक्ष केंद्रित केलं जातंय.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे गोदाम सुमारे दीड वर्षांपासून बांधकामाधीन होतं. बुधवारी दुपारी 12:07 वाजता ही पाच मजली उंच संरचना अचानक कोसळली. त्या वेळी सुमारे 40 मजूर आत काम करत होते. ढिगाऱ्याखाली सुमारे 15 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जातेय. या गोदामाचा एकूण परिसर सुमारे 20,000 चौरस फूट होता आणि आत कोणत्याही प्रकारच्या भिंती किंवा स्वतंत्र खोल्या नव्हत्या.
घटनास्थळी सिव्हिल डिफेन्स, लष्कर, NDRF, अग्निशमन दल आणि कोलकाता पोलिसांची संयुक्त पथकं बचाव कार्यात गुंतली आहेत. मोठे काँक्रीटचे ढिगारे आणि लोखंडी बीम हटवण्यासाठी क्रेन तसंच 50 टन क्षमतेची हायड्रॉलिक क्रेन वापरली जातेय. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना पाणी आणि ऑक्सिजन पुरवण्यात आलंय. रात्रीभर बचावकार्य सुरू ठेवण्यासाठी जनरेटर, तात्पुरते वैद्यकीय कॅम्प आणि अतिरिक्त रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
बचाव पथकांना ढिगाऱ्याखालून लोकांचे आवाज ऐकू आल्याची माहितीही समोर आलीये. त्यामुळे अडकलेल्या लोकांना वाचवण्याची आशा अजूनही कायम आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गोदामाची संरचना बुधवारी सकाळपासूनच हलत होती. कामगारांनीही याबाबत तपास करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही वेळातच संपूर्ण इमारत कोसळली.
या दुर्घटनेत मृतांमध्ये कृष्णा चौधरी, रोहित चौधरी आणि राहुल चौधरी यांची नावं समोर आली आहेत. इतर दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडूनही मदत जाहीर केली जाणार आहे. माहितीनुसार, मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच उद्या विधानसभेत राज्य सरकारकडून नुकसानभरपाईची घोषणा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.