Bihar : बिहारच्या राजकारणाला धक्कादायक वळण; स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या JMM ची निवडणुकीतूनच माघार

Bihar Politics : इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चानं दुसऱ्याच दिवशी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
bihar elections Hemant Soren, Tejasvi Yadav and Rahul Gandhi
bihar elections Hemant Soren, Tejasvi Yadav and Rahul Gandhisaam tv
Published On

Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीआधीच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चानं निवडणुकीआधीच आपला मार्ग बदलला आहे. झामुमोचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी शुक्रवारी रांचीत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण त्याच्या दोन दिवसांनीच पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद कुमार पांडेय यांनी नव्याने घोषणा करतानाच झामुमो बिहार निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. बिहार निवडणुकीत पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांनी अखेरच्या क्षणांपर्यंत दिशाभूल केली आणि अंधारात ठेवलं, असा आरोप झामुमो नेते पांडेय यांनी केला. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झारखंड मुक्ती मोर्चाकडून झारखंडमधील इंडिया आघाडीचा आढावा घेणार आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच झामुमोच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन जमुई, चकाई, धमदाहा, मनिहारी, पीरपैंती आणि कटोरिया या सहा जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. इंडिया आघाडीनं योग्य सन्मान दिला नाही, त्यामुळं बिहारमध्ये आता झामुमो स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असे पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ता सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले होते.

राजद आणि काँग्रेसवर आरोप

झामुमोच्या भट्टाचार्य यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला केला होता. २०१९ आणि २०२४ मध्ये आम्ही झारखंड कॅबिनेटमध्ये आरजेडी आणि काँग्रेसला मानसन्मान दिला, पण बिहारमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाचा सौदा केला जात आहे. वारंवार विश्वासघात सहन केला जाणार नाही, असा इशारा भट्टाचार्य यांनी दिला. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर झारंखडमध्ये इंडिया आघाडीबाबत आढावा घेतला जाणार आहे, असंही ते म्हणाले.

bihar elections Hemant Soren, Tejasvi Yadav and Rahul Gandhi
Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

झामुमो बाहेर, तेजस्वींना दिलासा

झामुमोने बिहार निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव आणि इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता जागावाटपाचा वाद जवळपास संपुष्टात आला आहे. काँग्रेस आणि राजदमध्ये चर्चेतून तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे बिहारच्या निवडणूक रिंगणात उतरल्यानं चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळेच सध्या आढावा धोरण अवलंबल्याचा निर्णय हेमंत सोरेन यांनी घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

bihar elections Hemant Soren, Tejasvi Yadav and Rahul Gandhi
Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com