Arunachal Pradesh Flash Floods Latest News : अरुणाचल प्रदेशातील दुर्गम सीमाभागात अचानक आलेल्या महापुरामुळे (Flash Floods) आणि डोंगरावरून झालेल्या भूस्खलनामुळे (Landslides) दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत भारतीय सैन्याचे ५ जवान बेपत्ता झाले आहेत. दुर्देवाने ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि प्रवाशांना नदीपात्राजवळ न जाण्याचा तसेच डोंगराळ भागात प्रवास करताना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना अचानक आलेला पूर आणि ठिकठिकाणी कोसळणाऱ्या दरडींमुळे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. खराब हवामानातही बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे.
अरुणाचल प्रदेशातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात लष्कराची दोन निवारा केंद्रे वाहून गेल्याने पाच जवान बेपत्ता झाले आहेत. तर दुसऱ्या एका दुर्घटनेत, अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील रस्ता बांधकाम स्थळावर झालेल्या भीषण भूस्खलनात चार जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातील केओजारिंग-बायचिंग रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणी हे भूस्खलन झाले. दरडीच्या ढिगाऱ्याखाली काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत ताडू बाकी, ताजी राय, मार्कोश बसुमतारी आणि बाबुल अली या चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बाबुल अली यांचा मृतदेह हाती आला असून उर्वरितांचा शोध सुरू असल्याची माहिती अप्पर सुबनसिरीच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, दिबांग व्हॅली जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. अचानक आलेल्या पुराच्या प्रचंड प्रवाहात ७ लष्करी जवान वाहून गेले. यातील दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून ५ जवान अद्याप बेपत्ता आहेत. हवालदार उपेंदर यांच्यासह कुंदन, विनोद, आदित्य आणि समुंदा अशी बेपत्ता जवानांची नावे आहेत. ५ व्या ग्रेनेडियर बटालियनची दोन शोध व बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली असून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे.