
अभिजीत देशमुख, साम टीव्ही
कल्याण : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. विद्यार्थ्यांना विरार घेऊन जाणारा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. वाहूत पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांमुळे २६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच उल्हासनगरहून विरारकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील 26 विद्यार्थ्यांचे प्राण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संभाव्य मोठा अपघात टाळला.
उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील 26 विद्यार्थी विरारच्या ग्लोबल स्कूलमध्ये फुटबॉल स्पर्धेसाठी प्रवास करत होते. बस वालधुनी पूल ओलांडून सुभाष चौकात पोहोचली. ती बस वळणावर वेडीवाकडी चालवली जात असल्याचे वाहतूक पोलिस सुरेश पाटील यांच्या निदर्शनास आले. कर्तव्यावर असलेल्या सुरेश पाटील यांनी सतर्कता दाखवत तत्काळ बस थांबवून चालकाची तपासणी केली.
चालक सुरेंद्र प्रसाद गौतम याने मद्यसेवन केल्याचे ब्रेथ एनालायझर चाचणीत उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी बस जप्त केली. तसेच चालकावर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणी चालकाला कोर्टात हजर करण्यात येणार असून दंड भरल्यानंतरच बस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे २६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचल्याने या कर्तव्यदक्षतेचे शहरभर कौतुक होत आहे. दुसरीकडे बस चालक मद्यधुंद असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.