
मुंबई : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानं आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलं आहे. त्यातच मराठीमध्ये बोलल्यानं मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं आहे. ते म्हणाले की, 'मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा', असं केडिया यांनी एक्सवर (ट्वीट) शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलं आहे.
या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'नेत्याला आव्हान करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मग्रूरी असून उपयोगाचं नाही. जो महाराष्ट्रात राहतो त्याने मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे किंवा मोठा उद्योजक असू दे, मराठी बोलणारच नाही, काय करायचं ते करा, अशी मग्रूरी कोणामध्ये असू नये. कारण आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मराठी माणसं आहोत, आणि अशा माणसाने सांगायचं की मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे', असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
याचपार्श्वभूमीवर राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की 'हे जे कुणी इसम आहेत, मी अखंड महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करेल की, आपण महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान नाही केला पाहिजे. जे कुणे उद्योजक आहेत, जे कुणी व्यक्ती आहेत, नक्कीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करुच. परंतु एकमेकांचा भावना दुखावतील अशी वक्तव्यं आपण टाळली पाहिजे. महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान आमचं सरकार सहन करणार नाही. सगळ्या भाषांचा सन्मान ठेवला पाहिजे, त्याबद्दल कोणतंही दुमत नाही. मराठी आणि हिंदी हा वाद राजकारणासाठी काही लोकं नक्कीच पेटवत आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी मराठी भाषेचा वापर अस्त्र म्हणून केला जात आहे. आमच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे, ते आमचं सरकार मराठी भाषेच्या विरोधात कधीच असू शकत नाही', असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
एक्सवरील आपल्या अकाउंटवरून राज ठाकरे यांना टॅग करत सुशील केडिया यांनी लिहिलं आहे की, 'गेली ३० वर्ष मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसंच तुम्ही ज्याप्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला?', असं आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.
केडीया यांनी राज ठाकरे यांना टॅग करत पुढे म्हटलं आहे की, 'ड्रामा बंद कर तुमचे दोन-तीन गुंडे १०-१२ फटके मारतील तर मारतील. आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर आणि जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण केलं तर, तुझं काय राहणार?' असं देखील त्यांनी एक्सवर (ट्वीट) म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.