

सोलापूरच्या समर्थ राकले यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर निवड
दुसऱ्या प्रयत्नात एमपीएससी केली पास
अपयश आले तरीही हार मानली नाही
अक्षय गुंड, सोलापूर
स्वप्न मोठं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी रस्तादेखील तेवढाच अवघड असतो.त्या मार्गावर चालण्यासाठी चिकाटी, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास खूप महत्त्वाचा असतो. याच विश्वासाच्या जोरावर अकलूज येथील समर्थ संजय राकले यांनी एमपीएससी परीक्षा पास केली.
समर्थ संजय राकले यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त (Class-1) पदावर झेप घेतली आहे. त्यांच्या या यशामागे केवळ अभ्यास नाही, तर विचारांची स्पष्टता, अपयशातून उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा दडलेली आहे.
शिक्षण
समर्थ यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. पुढे त्यांनी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयातून अकरावी-बारावी पूर्ण केले.त्यानंतर सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.
लहानपणीचे स्वप्न
“लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करायचं,” हा विचार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला होता. घरातील सुशिक्षित वातावरण, आजोबांनी केलेलं सामाजिक कार्य, आई-वडिलांचा मदतीचा स्वभाव या सगळ्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला. वालचंद कॉलेजमध्ये असताना यूपीएससी क्लब, मित्रांची तयारी आणि भावाचं अधिकारी पदावर झालेलं यश या सगळ्यांनी त्यांच्या मनात ठरवलेलं.
आयुष्यातला टर्निंग पॉइंट
कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नामांकित कंपनीत निवड होऊनही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. केवळ नोकरी करून समाधान मिळणार नाही. समाजासाठी काम करण्याची खरी संधी स्पर्धा परीक्षेतूनच मिळू शकते. हा निर्णयच त्यांच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट ठरला.
अपयश पचवून पुन्हा नव्याने सुरुवात
२०२२ मध्ये अवघ्या १.५ गुणांनी मुलाखतीसाठी अपात्र ठरले होते. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता. त्या वेळी एक क्षण असा आला की, सर्व काही सोडून द्यावं असं वाटलं. पण इथेच खरी लढाई सुरू झाली. कुटुंबियांचा विश्वास, मित्रांचा आधार विशेषतः नितीन या मित्राची साथ यामुळे त्यांनी पुन्हा स्वतःला सावरलं.
कठीण प्रसंगातही अभ्यासात सातत्य
तयारीदरम्यान त्यांच्या आयुष्यात एक मोठा भावनिक धक्का बसला. मेन्स परीक्षेच्या अगोदर त्यांच्या होणाऱ्या सासऱ्यांचे अचानक निधन झाले. अशा परिस्थितीत अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत कठीण होते. मात्र, त्यांच्या होणाऱ्या पत्नीने स्वतःच्या दुःखावर मात करत त्यांना प्रोत्साहन दिलं.या प्रसंगाने त्यांना खूप काही शिकवले.
कुटुंबामुळेच पुन्हा उभे राहिले
समर्थ यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. वडील व्यवसायिक, तर आई वकील असून, घरात नेहमी सकारात्मक आणि प्रोत्साहनात्मक वातावरण होते. विशेष म्हणजे, त्यांच्या आईने स्वतःच्या शिक्षणातून त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण केली. “आज मी जे काही आहे, ते माझ्या कुटुंबामुळेच,” असे त्यांनी सांगितले.