Maharashtra Live News Update: विक्रोळीतील महालक्ष्मी डेरीतील ‘माझा’ शीतपेयात आढळला कचरा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६, महाराष्ट्रात अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, अवकाळी पाऊस, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

विक्रोळीतील महालक्ष्मी डेरीतील ‘माझा’ शीतपेयात आढळला कचरा

विक्रोळी टागोर नगर येथील रामभजन कंपाऊंडमधील महालक्ष्मी डेरीमधून खरेदी केलेल्या ‘माझा’ या थंडपेयाच्या बॉक्समध्ये कचरा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीर काली या ११ वर्षांच्या मुलाने अर्धा पेय प्यायल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागला.

पालकांनी बॉक्स तपासला असता त्यात कचरा आढळून आला. याबाबत दुकानदाराला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप आहे. संतप्त पालकांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ संबंधित दुकानदाराला ताब्यात घेतले असून पुढील तपास विक्रोळी पोलीस करत आहेत.

ठाणे–बोरिवली भुयारी मार्गातील माती वाहतुकीवर संभ्रम

ठाणे–बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईतून निघणारी माती वाहतुकीसाठी कन्वेयर बेल्टचा प्रस्ताव रद्द करून दररोज सुमारे ३५० डम्पर वापरण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने घेतल्याने प्रकल्प पुन्हा वादात सापडला आहे. मुल्लाबाग परिसरातील काही रहिवाशांनी हवा व ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडीची भीती व्यक्त करत विरोध दर्शविला आहे. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कन्वेयर बेल्टद्वारे बंदिस्त वाहतुकीचा निर्णय झाल्याचा दावा रहिवाशांचा आहे.

ठाणे महापालिकेत एकाच महासभेत स्थायी समिती, स्विकृतसह इतर समिती सदस्यांची निवड

ठाणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचे गणित सुटल्यानंतर सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेता देखील जाहीर करण्यात आला आहे. परंतु आता येत्या ५ मार्च रोजी स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसह, स्विकृत नगरसेवक, शिक्षण, परिवहन, विषय समित्या, प्रभाग समिती आदींमधील सदस्यांची निवड देखील एकाच दिवशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या महासभेत झालेल्या गोंधळानंतर आता नवी मुंबईचे पडसाद ठाण्यात उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नवी मुंबईत भाजपने ज्या पध्दतीने परिवहनमध्ये आपल्याच पक्षातील सदस्यांची निवड केली. तशीच काहीशी परिस्थिती ठाण्यात शिंदे सेनेकडून निर्माण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

रमजानमध्ये कैद्यांना इफ्तारी आणि नमाजची स्वतंत्र सुविधा

रमजान या पवित्र महिन्यात हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या मुस्लिम कैद्यांना इफ्तारीसाठी फळे उपलब्ध करून देणे तसेच नमाज अदा करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी, याबाबत Imtiaz Jaleel(माजी खासदार)यांच्या वतीने कारागृह प्रशासनाकडे अधिकृत पत्र देण्यात आले होते. या पत्रात रमजान काळात रोजा ठेवणाऱ्या कैद्यांच्या धार्मिक गरजांकडे मानवीय दृष्टिकोनातून पाहण्याची मागणी करण्यात आली होती.

या पत्रव्यवहाराची दखल घेत कारागृह प्रशासनाकडून अधिकृत उत्तर प्राप्त झाले असून, त्यानुसार रमजान महिन्यात रोजा करणाऱ्या कैद्यांसाठी वेळेवर सेहरी व इफ्तारीची व्यवस्था करण्यात येत आहे. इफ्तारीसाठी फळे व आवश्यक आहार नियमानुसार उपलब्ध करून दिला जात असून, कैद्यांना धार्मिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र बॅरेक/ विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेत ५ मार्चला स्थायी समितींची निवड; राजकीय तणाव वाढण्याची शक्यता

ठाणे महापालिकामध्ये महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेते जाहीर झाल्यानंतर आता ५ मार्च रोजी स्थायी समिती सदस्यांसह विविध समित्यांच्या निवडी एकाच दिवशी होणार आहेत. पहिल्या महासभेतील गोंधळानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. नवी मुंबईतील घडामोडींचे पडसाद ठाण्यात उमटण्याची चिन्हे असून, शिंदे सेनेकडून वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स कायम

* नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स कायम

* राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नोंदणी केलेले अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांची माघार नाहीच

* सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निवडणूक लढण्यावर मुकेश शहाणे ठाम

* सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती

* नाशिकच्या स्थायी समिती सभापती पदासाठी अजित दादांची राष्ट्रवादीदेखील आग्रही

* मुख्यमंत्र्यांशी चर्चा घेतल्यानंतरच निर्णय होणार

* भाजपाच्या बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांवर पाणी

राजूर–अहिल्यानगर लाँगमार्चचा अकोलेत पहिला मुक्काम

राजूर येथून निघालेला लाँगमार्च २२ किलोमीटरचा पायी प्रवास करत अकोले शहरात दाखल झाला. सुमारे सात तास चालत आंदोलनकर्ते अकोलेत पोहोचले. आज लाँगमार्चचा पहिला मुक्काम अकोले तहसील कार्यालयासमोर असलेल्या प्रांगणात करण्यात येणार आहे. हा लाँगमार्च राजूर ते अहिल्यानगर असा एकूण १४८ किलोमीटरचा आहे. उद्या सकाळी आंदोलनकर्ते पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहेत.

वर्ध्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

वर्धा येथे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुरू केले आहे. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भूमी अभिलेख विभागातील मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोर्चा काढून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

पुन्हा अवकाळीचा कहर,यवतमाळच्या उमरखेड शहरात अवकाळी पावसाने झोडपलं

पुन्हा अवकाळीचा कहर,यवतमाळच्या उमरखेड शहरात अवकाळी पावसाने झोडपलं

वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची एन्ट्री,उमरखेड शहरात वादळवाऱ्या विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस

यवतमाळच्या उमरखेड शहरात अवकाळी पावसची हजेरी

लाडकी बहिणींचा 'जानेवारीचा हप्ता' आला!

महाराष्ट्रातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा झाला असून, त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. लाडकी बहीण योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असून, पुढील हप्त्याबाबतही लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

लातूर जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना मोठा फटका

लातूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, जिल्ह्यातल्या लातूर शहरासह, औसा, मुरुड या भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडतो आहे, दरम्यान पुढची दोन दिवस हवामान विभागाने लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना बसलाय, आंबा फळबागेसह गहू, ज्वारी ,हरभरा या पिकांचे प्रचंड मोठं नुकसान झाले आहे

एसटी बस व डीजे वाहनाचा अपघात

चांदवड-मनमाड रस्त्यावर शिंगवे फाट्या जवळ एसटी बस व डीजे वाहनाचा समोरा समोर अपघात होऊन यात डीजे वाहनाचे मोठ नुकसान झाले आहे.

बिबट्यांचा बंदोबस्त करा.. शेतकऱ्यांनी थेट प्रधानमंत्री मोदींना पाठवले बैलगाडीभर पत्र 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. वन्यजीव प्राणी कायद्यात बदल करून बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा पर्याय राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 1 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे.

नालासोपा-यात सख्या भावानेच मोठ्या बहिणीची केली निर्घूणपणे हत्या

गावाच्या जमिनीच्या वादातून ही हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बहीण, ८० वर्षाची आई यांच्यावर कोयत्याने प्राणघातक वार केले आहे.

भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू 

नाशिकच्या चांदवड मध्ये भरदुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे.चांदवड-निफाड रस्त्याने मुलांना शाळेतून घेण्यासाठी पायी जात असतांना भरधाव जाणा-या क्रेटा कारने स्वाती कृष्णा कुंभार्डे या २९ वर्षीय महिलेसह एका दुचाकी स्वाराला चिरडल्याने त्यात महिलेचा जागीच म-त्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला,पोलिसांना याची माहिती मिळाली.

बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडापलं 

बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. गहू, कांदा आणि ज्वारी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्याला फटका,14 हजार 672 हेक्टर वरील रब्बी पिकांचे नुकसान

लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 14 हजार 672, हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना आणि फळबागांना फटका बसलाय. रेनापुर, अहमदपूर, उदगीर, आणि निलंगा यासह इतर गभागात प्रचंड मोठा फटका बसला. गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा पिकांना मोठा फटका बसला.

यवतमाळ शहरात महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी 

यवतमाळ शहरातील वडगांव रोड परिसरात एका विकृत तरूणाने उच्छाद मांडला असून रात्रीच्या वेळी घरात शिरून महिलांची अंतर्वस्त्रे चोरी करतांनाचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पकडण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये तृतीयपंथीयांची संख्या सगळ्यात जास्त

वर्सोवा पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष मोहिम राबवत बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास असलेल्या 24 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यामध्ये 21 तृतीयपंथी, 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. शक्रुल्लाशहा दर्गा परिसरात संशयास्पद हालचालींवरून कारवाईला सुरुवात झाली.

Navi Mumbai: तळोजा परिसरात १ कोटींचे अमली पदार्थ जप्त, २ जणांना अटक

तळोजा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली

तळोजा परिसरात १ कोटी २ लाखांचे अमली पदार्थ जप्त

याप्रकरणी २ जणांना पोलिसांनी अटक केली

Pune: पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

पुणेकरांचे आरोग्य धोक्यात

आरएमसी प्लांट नव्हे धुळीचे कारखाने

धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

अनेकांना घर बंद करून घरात राहावं लागतं

शहरात अनेक मोठ्या गाड्यांचा वावर मिक्सर ,टिप्पर, डंपर राजरोसपणे रस्त्यावर

Raigad: धावत्या दुचाकीने घेतला पेट, चालक थोडक्यात बचावला

रायगड -

धावत्या दुचाकीने घेतला पेट

चालक थोडक्यात बचावला

रायगडतील माणगाव निजामपूर रोडवरील घटना

आगीत दुचाकी जळून खाक मात्र आगीच कारण अस्पष्ट

Pandharpur: पंढरपूरमध्ये नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

पंढरपूर -

नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

दलित महासंघाच्या वतीने पंढरपूर नगरपालिका मराठा शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तराचे वाटप करण्यात आले.

येथील लोकमान्य शाळेत माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Sangli: सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्ताविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्ताविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आयुक्तांनी मनमानीपद्धतीने दुकाने हटविल्याने निषेध

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्त सत्यम गांधी यांनी मनमानी पद्धतीने सांगलीतील दुकाने व अतिक्रमणे पाडल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सांगली शहराच्या विश्रामबाग परिसरात असणारी दुकाने केवळ 24 तासांची नोटीस देऊन आयुक्त सत्यम गांधी यांनी पाडली होती.

Nashik: नाशिक- पुणे महामार्गावर सुरू असलेले हिंदू संघटनांचे ठिय्या आंदोलन मागे

नाशिक -

- दोन तासानंतर सिन्नर नाशिक- पुणे महामार्गावर सुरू असलेले हिंदू संघटनांचे ठिय्या आंदोलन मागे...

- सिन्नर मधील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी हिंदू संघटना आक्रमक...

- सिन्नर तहसीलदार आणि पोलिसांकडून आठवडाभरात मुलीला आणि संशयितास ताब्यात घेणार असल्याचे आंदोलकांना आश्वासन...

- आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांना देखील घेरण्याचा झाला प्रयत्न...

- रस्ता रोको आंदोलनानंतर सिन्नर नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत व्हायला सुरुवात

Nagpur:  ब्रिटिश एअरवेजच्या विमानाची नागपूरात इमर्जन्सी लँडिंग

नागपूर -

- ब्रिटिश एअरवेजच्या विमानाची नागपूरात इमर्जन्सी लँडिंग

- ब्रिटिश एअरवेजच्या बोइंग 787 विमानाची नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

- लंडनहून हैदराबादला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड लक्षात आल्यावर नागपूरात लँडिंग

- विमानात एकूण 169 प्रवासी असल्याची माहिती

- हैदराबाद मध्ये खराब हवामानामुळे विमानाला लँडिंग ची परवानगी दिली नसल्याची माहिती

- पहाटे साडे पाचच्या सुमारास विमान नागपूरात सुखरूप उतरले

- विमानातील सर्व प्रवासी सुखरूप

Nashik: नाशिकच्या सिन्नरमध्ये हिंदू संघटना आक्रमक

नाशिक -

- नाशिकच्या सिन्नरमध्ये हिंदू संघटना आक्रमक

- नाशिक सिन्नर रस्त्यावर गेल्या एक तासांपासून रास्ता रोको करत केले ठिय्या आंदोलन

- आंदोलनामुळे गेल्या एक तासांपासून नाशिक सिन्नर मार्गावरील वाहतूक ठप्प

- मागील १० ते १५ दिवसापासून एका मुलीचे अपहरण झाल्याचा आरोप, पोलिस कारवाई करत नसल्याने आज आंदोलन

- लव्ह जिहाद असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप

Dharashiv: शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

धाराशिव -

शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा कागदावरच,प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप

शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आंदोलकांची घोषणाबाजी

मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी शेकडो विद्यार्थी आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

Ahilyanagar: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चला सुरुवात, राजूर ते अहिल्यानगरपर्यंत जाणार मोर्चा

अहिल्यानगर -

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चला सुरुवात

राजूर ते अहिल्यानगर असा 148 किलोमीटरचा पायी लाँगमार्च...

किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात लाल वादळ अहिल्यानगरच्या दिशेने मार्गस्त...

आदिवासी, शेतकरी, कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पायी लाँगमार्चचे आयोजन...

हजारोंच्या संख्येने आंदोलक लाँगमार्चमध्ये सहभागी...

सांडपाणी थेट कृष्णा नदीमध्ये

शिरोळ तालुक्यातील अकिवाटे औद्योगिक वसाहती मधील प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट कृष्णा नदीमध्ये मिसळत असल्याचा गंभीर आरोप अर्जुनवाडगावच्या ग्रामस्थांनी केला आहे.. प्रकरणावरून ग्रामस्थांनी आक्रमक होत काल प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला होता... हे प्रदूषण तात्काळ थांबवावं या मागणीसाठी आज अर्जुनवाड ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन केल आहे.. गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी देखील या गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे... औद्योगिक वसाहती मधून कृष्णा नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे भागातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे शिवाय शेतीवर देखील याचा परिणाम असल्याचा असल्यान प्रदूषण तात्काळ थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी केली राजावाडी रुग्णालयाची पाहणी

मुंबई मनपा मधील शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज घाटकोपर च्या राजावाडी रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. पेडणेकर यांनी सर्व वॉर्ड मध्ये जाऊन रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली.या वेळी त्यांनी सुरक्षा रक्षक, डॉक्टर, आणि साहित्यांची उपलब्धता या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

बीड : आंतरजिल्हा घरफोडी टोळीतील तिघे जेरबंद, दोन लाखांची रोकड जप्त

बीडच्या पाटोदा तालुक्यात घरफोडी प्रकरणात पोलिसांनी मोठे कारवाई केलीय.. स्थानिक गुन्हे शाखेने फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आंतरजिल्हा टोळीतील तीन आरोपींना बेड्या ठोकल्यात. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत. महासांगवी शिवारात संशयित मोटारसायकलवरून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी तब्बल दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही धडक कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास सुरू आहे.

गडचिरोलीत धडकला लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा

गडचिरोली : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कार्यरत लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांसाठी 16 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र शासनाकडून अद्यापही या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील 400 लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामुळे गडचिरोली जिल्हा परिषदसह पंचायत समित्यांमध्ये प्रशासकीय कामकाज पूर्णता ठप्प पडले आहे. प्रशासनाचा आधारस्तंभ असलेल्या लिपिक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह आदी मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या बेमुदत आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

भंडाऱ्याच्या माडगी इथं घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

भंडारा जिल्ह्यातील माडगी इथं घरातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. शुभम वाहिले यांच्या घरी ही घटना घडली. स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज आणि हादरा परिसरात दूरवर जाणवला. सुदैवानं, या घटनेच्या वेळी घरातील सदस्य थोडक्यात बचावल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. शुभम वाहिले यांच्या घरातील किचनमध्ये गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की, किचनमधील भांडी, गॅस शेगडी आणि इतर सर्व साहित्याचा अक्षरशः चक्काचूर झाला. घराच्या भिंतींना तडे गेले असून छताचेही नुकसान झाले आहे. आवाजाचा अंदाज घेऊन शेजाऱ्यांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. या घटनेत वाहिले कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू आणि किचनमधील सर्व सामान अस्ताव्यस्त होऊन निकामी झाले आहे.

नवनियुक्त महापौर व उपमहापौर यांच्यासह नगरसेविका व नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करीत केला निषेध...

सोमय्या यांच्या विरोधात दिल्या जोरदार घोषणाबाजी...

सोमय्या राजकारणासाठी निर्माण करताहेत सामाजिक तेढ..

सोमय्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या आयुक्तांची गाडी नगरसेवकांनी अडविली गाडी...

हातात तिरंगा ध्वज घेत केला जोरदार विरोध

संभाजीनगर - बट्या दिसल्याने भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नादरपुर शिवारात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरणनिर्माण झाले आहे. पांडुरंग निकम आणि दादाराव निकम यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही संपूर्ण घटना शेतात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्या गोठ्याच्या परिसरात शिरताना आणि सावजावर झडप घालताना स्पष्टपणे दिसत आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. सध्या ग्रामस्थांकडून वनविभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर न पडण्याचे आणि पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गडचिरोलीत धडकला लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा

गडचिरोली : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कार्यरत लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांसाठी 16 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र शासनाकडून अद्यापही या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील 400 लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामुळे गडचिरोली जिल्हा परिषदसह पंचायत समित्यांमध्ये प्रशासकीय कामकाज पूर्णता ठप्प पडले आहे. प्रशासनाचा आधारस्तंभ असलेल्या लिपिक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह आदी मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या बेमुदत आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

अल्पसंख्याक विकास विभागाचा खुलासा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी (दि.२८ जानेवारी २०२६ रोजी) अल्पसंख्याक विकास विभागामार्फत कोणत्याही नवीन फाईल्सवर किंवा प्रमाणपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आलेली नाही, असा खुलासा अल्पसंख्याक विकास विभागाने केला आहे. तसेच त्या दिवशी कोणतेही प्रमाणपत्र वाटप झालेले नसल्याचेही विभागाने नमूद केले आहे. अल्पसंख्याक दर्जा प्रदान करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन, पारदर्शक असून २७ मे २०१३ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसारच राबवली जाते. अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी झाल्यानंतरच छाननी करून प्रमाणपत्रे वितरित केली जातात, असे विभागाने नमूद केले आहे. विभागामार्फत कोणतेही अनधिकृत अथवा घाईघाईने कामकाज झाल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असल्याचा ठाम दावा विभागाने केला आहे.

वर्ध्याच्या गोविंदपुर शिवाराला गारपिटीचा तडाखा

वर्ध्याच्या गोविंदपुर शिवाराला सोमवारी दुपारी गारपीट व वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. त्यामुळं तरबूज पिक जमिनदोस्त झालं आहे. हातचं टरबूज पिक जमिदोस्त झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गोविंदपूर इथल्या राहुल चौधरी यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

थोडाच वेळात राजूर ते अहिल्यानगर लाँगमार्चला सुरुवात होणार

आदिवासी, शेतकरी, कर्मचारी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आज राजूर ते अहिल्यानगर अशा 148 किलोमीटर लाँगमार्चचे आयोजन करण्यात आलंय.. किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात काही वेळातच हजारो आंदोलकांसह या पायी लाँगमार्चला सुरुवात होणार आहे.. राजूर गावात आंदोकल जमण्यास सुरुवात झाली असून शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिला देखील मोठ्या संख्येने या लाँगमार्चमध्ये सहभागी होणार आहेत.. मंत्र्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलांना 25 हजार पगार आणि आम्हाला अवघे अडीच हजार, हा कुठला न्याय असा प्रश्न उपस्थित करताना या महिलांचे डोळे पाणवल्याचं बघायला मिळालं.. अकोले, संगमनेर आणि त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी हा लाँगमार्च धडकणार आहे.. पालकमंत्र्यांच्या दारात प्रश्न सुटले नाहीत हा लाँगमार्च थेट अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

सांगलीत काँग्रेसमध्ये गटबाजी? Satej Pati काय म्हणाले?

चंद्रपूरप्रमाणे सांगलीतही काँग्रेसमध्ये गटबाजी उभी राहिली आहे. दोन गटांमध्ये विभागल्यामुळे महापालिकेत वाद निर्माण झाले आहेत. नाराज गटात काँग्रेसचे ८ नगरसेवकांचा समावेश असून, हा गट भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. चंद्रपूरप्रमाणे सांगलीतही ‘मिशन लोटस’ राबविण्याची शक्यता आहे.

सोलापूर - शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77 कोटी रुपयांची थकबाकी..

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77 हजार कोटी रुपयांची थकबाकी अद्याप कायम आहे. कंत्राटदरांच्या आक्रमक पवित्र्यानंतर थकबाकीतील काही रक्कम देण्याचे सरकारने जाहीर केले.मात्र वर्षाभरात केवळ 10 टक्केच रक्कम अदा झाली आहे.तर काही विभागातील थकबाकीसाठी शासनाने चेक दिलेत मात्र ट्रेजरीकडे पैसेच नसल्याने हे चेक वटत नसल्याचा आरोप राज्य कंत्राटदार महासंघाने केलाय.‘’मागील वर्षापर्यंत कंत्राटदरांचे जवळपास 89 हजार कोटींचे देयके प्रलंबित होती.कंत्राटदार आणि अभियंताच्या आक्रमक भूमिकेनंतर शासनाने काही पैसे दिलेत. त्यानंतर ही जवळपास 77 हजार कोटींचे देयके अद्याप ही प्रलंबित असून नवीन एक ही काम मंजूर नाहीये.शिवाय जी कामे सुरु होती ती निधी अभावी रखडलेली आहेत.‘’ शासनाच्या या भूमिकेविरोधात 9 मार्च रोजी शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांची बैठक आयोजित केल्याची माहिती राज्य शासकीय अभियंता आणि कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली आहे.

बीड: अवकाळी पावसाचा फटका

बीड जिल्ह्यात काल अवकाळी पावसाचा तडाका शेतकऱ्यांच्या शेती पिकांना बसला असून यामध्ये शेती पिकांचे नुकसान झालं आहे गारपीटी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला यामध्ये शेतकऱ्यांचे शेतामधील ज्वारी बाजरी गहू हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याच अवकाळी पावसाचा फटका बीडच्या वडवणी तालुकातील चिंचवड गावाला बसला असून शेतकऱ्यांचे जवारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Hingoli: कळमनुरी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

हिंगोली उन्हाळा सुरू होण्याआधीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या घोटासाठी नागरिकांची भटकंती सुरू असताना आता कळमनुरी शहरात देखील पालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांनी कळमनुरी पालिकेचे मुख्याधिकारी रवी दरक यांच्या दालनात जाऊन त्यांना झापले आहे, आम्ही वेळेत पालिकेचा कर भरतो मात्र पिण्याच्या पाण्यासाठी डोळे लावून वाट पहावी लागत असल्याचं या महिला म्हणाल्या आहेत दरम्यान दिवसभर घरातील कामे करायची का पिण्याच्या पाण्याच्या शोधात शहरात भटकायचे असा संतप्त सवाल देखील या महिलांनी कळमनुरी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला विचारला आहे

राष्ट्रपतींच्या शेगाव दौऱ्यामुळे श्री संत गजानन महाराज दर्शन वेळेत बदल...

दिनांक २५ फेब्रुवारी रोजी देशाच्या महामहीम द्रौपदी मुर्मु या शेगाव दौऱ्यावर येत असून त्या श्री संत गजानन महाराज समाधी स्थळ येथे दर्शन घेणार आहेत. सर्वोच्च राजशिष्टाचारानुसार सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात येत आहे....याच पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारी रोजी मंदिरात सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम होणार असल्याने सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शन सर्वसामान्य भक्तांसाठी बंद राहील.....तसेच २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत दर्शन स्थगित राहणार आहे....श्री संत गजानन महाराज संस्थान यांनी भाविकांनी बदललेल्या वेळेनुसार आपला कार्यक्रम आखावा, असे आवाहन केले आहे...

Satara: साताऱ्यात श्रमिक मुक्ती दलाचे साताऱ्यात आंदोलन...

कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करुन पर्यायी गावठाणांमध्ये त्यांची पुनर्वसन प्रक्रिया तातडीने सुरु करावी, विभागीय आयुक्तांच्यासोबत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्तीदलाच्यावतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विस्थापनाला ६० ते ६५ वर्षे पूर्ण होवूनही ४ हजार २८९ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यातील १ हजार ३९४ नागरिकांना अंशतः जमीन वाटप झाले असून २ हजार ८९५ खातेदारांन जमीन वाटपही झाले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत अनेक बैठका होवून एकाही खातेदाराचे पुनर्वसन होवू शकले नाही. १४४ खातेदारांची यादी अंतिम आदेशासाठी सातारा पुनर्वसन कार्यालयाने पाठवली असूनही पुढील प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे पुनर्वसन प्रक्रिया गतीमान करण्यासाठी रॅली काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Dharashiv: धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती, द्राक्षला तडे जायला सुरुवात

द्राक्षला तडे गेल्यास बाजार भावात 30 ते 40% नुकसान

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अगोदरच उत्पादनात घट, त्यानंतर अवकाळी पावसाचे दुहेरी संकट

द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात, सरकारनं मदत करावी शेतकऱ्यांनी व्यक्त केली भावना

Bhandara: साकोलीत मोकाट कुत्र्याचा हैदोस; दोन तासांत ५ जणांना घेतला चावा...

भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून,रोजी रात्रीच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने विविध प्रभागांत धुमाकूळ घालत पाच नागरिकांना चावा घेऊन जखमी केले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.साकोली शहरातील विविध प्रभागांमध्ये वावरणाऱ्या एका लावारिस कुत्र्याने समोर येणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ले चढवले. अवघ्या दोन तासांच्या कालावधीत या कुत्र्याने पाच जणांना गंभीर जखमी केले.जखमी झालेल्या पाचही नागरिकांना तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शहरात अशाप्रकारे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रात्रीच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले आहे..

Pandharpur: पंढरपुरातील उद्यानाच्या कामात मोठा भ्रष्टाचार; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचा आरोप

कोट्यावधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील जिजामाता उद्यानाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामात अधिकारी व ठेकेदाराने कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे असा गंभीर आरोप मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे.

पंढरपूर शहरात नगरपालिकेच्या वतीने जिजामाता उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे सात कोटी रूपयांचा खर्च केला आहे. उद्यान खुले करण्यापूर्वी मनसेचे धोत्रे यांनी उद्यानाची पाहणी केली असता काम निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे.

उद्यानात बसवलेले पेविंग ब्लाॅक निखळून पडले आहेत. खेळणी साहित्याची मोडतोड झाली आहे. भिंतींना तडे गेले आहेत अशा अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत असा आरोप करत या कामाची चौकशी करावी अशी मागणी ही धोत्रे यांनी केली आहे.

Kharadi: खराडी परिसरात फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांचा बुलडोझर

खराडी पोलीस स्टेशन हद्दीत मॉडीफाईड सायलन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रहिवाशांच्या वारंवार तक्रारीनंतर पोलिसांनी सापळे रचून तब्बल ४५ बुलेट व इतर दुचाकी जप्त केल्या.वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत सर्व गाड्यांचे मॉडीफाईड सायलन्सर काढून कंपनीचे मूळ सायलन्सर बसवले. जप्त करण्यात आलेल्या मॉडीफाईड सायलन्सरवर थेट बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात आले.

Pandharpur: पंढरपूर प्रस्तावित काॅरिडाॅरच्या कामाचे सादरीकरण

पंढरपुरातील प्रस्थापित काॅरिडारचा मार्ग मोकळा झाला आहे‌‌.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत काॅरिडाॅरच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात उज्जैन आणि काशीच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

बैठकीला आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वसईच्या वालीव परिसरात लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन गटात वाद

वसईच्या वालीव परिसरातील खान कॉम्प्लेक्स येथे लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन गटात वाद

किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेत अब्दुल रहमान खान नावाचा व्यक्तीवर चाकूने वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वालीव पोलिसांनी घटनेची नोंद झाली असून आरोपी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी खान कुटुंबीयांनी केली आहे.

Sharad Pawar: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा

शरद पवार यांच्या सगळ्या तपासण्या नार्मल

त्यांनी त्यांना द्रव पदार्थ हलका आहार घेण्यास सुरुवात केली आहे

त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे

उद्या शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता

दोन दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाणार आहे

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती

गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश 23 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .

पूर्वी गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर कार्यरत होते. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदलानुसार आता राजेश अग्रवाल हे गडचिरोली जिल्ह्याचे नवीन पालक सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

Viamannagar: विमाननगरमधील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा,उडी मारल्याने तरुणीचा मृत्यू

विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत घाबरलेल्या तरुणीने इमारतीच्या खिडकीतून उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला. तर स्पाचा व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना विमाननगरमधील सिटी स्पेस इमारतीच्या परिसरात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर पोलिसांनी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सिटी स्पेस इमारतीच्या परिसरातील स्पा सेंटरवर छापा मारला. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा ठोठावल्यानंतर स्पा सेंटरमधील घाबरलेल्या तरुणीसह व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला. तर, व्यवस्थापकाच्या पायाला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. संकिता मुखर्जी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या कारवाईत इतर चार तरुणींची सुटका करण्यात आली.

Nagpur: नागपुरातील बारावी पेपर फूट प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक

नागपुरातील बारावी पेपर फूट प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणुक

बारावीच्या परीक्षेत नागपुरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रातून रसायन शास्त्राचे पेपर फुटल्याचे समोर आले..

या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या पाच सदस्याची एसआयटी नेमण्यात आली आहे.

पेपर नेमके कुठून फुटले, यामध्ये मंडळातील अधिकाऱ्याची भूमिका काय,कोणाकोणापर्यंत पोहचले आणि ईतर जिल्ह्यात पाठवले गेले काय... याचा सखोल तपास हे पथक करणार..

या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे..

खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षक निशिकांत मुन आणि विद्यार्थी फैजान यांना पोलिसांनी अगोदर अटक केली होती..

त्यानंतर काल एक्सलेंट अकादमीचा संचालक मुस्तफा खान आणि जुनेद मोहम्मद या दोघांना अटक केली आहे..

नंदुरबारच्या पर्यटनात मानाचा तुरा..तोरणमाळमध्ये 2 कोटींच्या झीप लाईनचे लोकार्पण....

राज्यातील महाबळेश्वरनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळमध्ये आता पर्यटकांना साहसी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. तोरणमाळ येथील प्रसिद्ध सीताखाई पॉइंटवर तब्बल दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला झीप लाईन प्रकल्प नुकताच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा वार्षिक योजनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला आहे.

मढी येथील यात्रे दरम्यान मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकान लावून न देण्याच्या ठरावाला औरंगाबाद हाय कोर्टाकडून स्थगिती - मुस्लिम व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथील श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावू देणार नाही असा पवित्रा मढी ग्रामपंचायतचे सरपंच संजय मरकड यांनी घेतला होता. मुस्लिम व्यापारी यात्रा उत्सव दरम्यान पावित्र्य राखत नाहीत या कारणावरून दुकाने लावू देणार नाही असा ठराव मागील वर्षी ग्रामसभेने केला होता. त्याच आधारावर यावर्षी सुद्धा सरपंच संजय मरकड हे दुकाने लावू न देण्यास ठाम आहेत.मात्र आता याबाबत मढी येथील मुस्लिम व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन सरपंच ज्या ठरावाबाबत बोलत आहेत त्या ठरावाला मागील वर्षी औरंगाबाद हायकोर्टाकडून स्थगिती मिळाली असून त्यामुळे मुस्लिम व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी दुकाने लावण्यास काहीही हरकत नाही मात्र सर्व गाव एकत्र गुण्या गोविंदाने नांदत असताना फक्त सरपंच धार्मिक तेढ वाढवत असल्याचा आरोप मुस्लिम व्यापाऱ्यांनी केला आहे.

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा

हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे, हिंगोली सह वसमत तालुक्यात वादळी वारा व अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे तर काही गावात नागरिकांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेली आहेत वसमत शहरात बाजारपेठेत देखील अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने किरकोळ व्यावसायिक असणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com