

मनोज जरांगे पाटील ३० मेपासून उपोषणावर बसणार
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव वाढला
उष्माघातामुळे काही झाल्यास सरकार जबाबदार असेल, असा इशारा
कठोर उपोषण करायचं आहे, उन्हात बाज टाकून मी उपोषण करणार, जे होईल ते होईल उष्माघातामुळे बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळे जाईल, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपली उपोषणाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. कठोर निर्णय घेणार असून ३० मे रोजी उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे म्हणालेत.
सरकारला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिला होता, त्या काळात सातारा गॅझेटिअरवर जीआर काढला गेला नाही, असं जरांगे म्हणालेत. आता मेलो तरी चालेल, मला मराठा समाजाला रिझल्ट द्यायचा आहे. उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर सरकारकडून फोन येतील, पण फोन येऊन उपयोग नाही, त्याचा परिणाम काही होत नाही. म मला चर्चा नकोय, आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे, असं जरांगे म्हणालेत.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आणि सातारा गॅझिटिअर लागू न झाल्यानं मनोज जरांगे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी अंतरावली सराटी येथे पत्रकार परिषद घेतील. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर आगपाखड केली.
सरकारला 10 महिने वेळ दिला पण अंमलबजावणी झाली नाही,त्यामुळे आपला नाईलाज आहे. मला कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या लेकराला, समाजाला न्याय मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. मी सीमारेषेवर आलोय. मी आमरण उपोषण करण्याचं ठरवलं आहे. मात्र उपोषण आंदोलन करण्याचा ठिकाणात बदल करण्यात आला असून आता आमरण उपोषण सावलीत, मंडपात करणार नाही. मला आता अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे, रखरखत्या उन्हात हे उपोषण बाज टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार, असं उपोषण आपण करणार असल्याचं जरांगे म्हणालेत.
मग जे काही होईल ते होईल. उष्माघाताने बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं बळी जाईल. त्यासाठी सरकार जबाबदार असेन. कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकरत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय. तर आपण आपली कदर का करायची, असं जरांगे म्हणाले.
आमरण उपोषण कुठेही होईल, रानात होईल, कडक उन्हात ते उपोषण होईल यावर मी ठाम आहे. मग किती वेदना होतील याचा विचार करायचा नाही हे ठरवलंय. सारखी सारखी उपोषणं करुन जीवाला वेदना होत आहेत. एकदा तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा,असा इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.