राज्यासाठी आजचा दिवस महत्वाचा
पालघर, रायगड, नाशिक आणि पुण्याला रेड अलर्ट
मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट
नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाण्यासह अनेक शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे आज राज्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज देखील महत्वाचा असणार आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिकसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, मुंबई उपनगर, कोकण घाटमाथा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुण्याला आज सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह पिंपरी -चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. पुण्यात ६ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. चिंचवड: १३२ मिमी, लोहगाव: ९८ मिमी, पाषाण: ६९ मिमी आणि शिवाजीनगरमध्ये ५५ मिमी पावसाची नोंद झाली.
नाशिक शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये आज अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नाशिक शहरासह त्रंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, इगतपुरीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले आहे. एसडीआरएफचे पथक देखील नाशिकमध्ये तैनात करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.. काल रात्रीपासून जिह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. मात्र वरुणराजाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. तर पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.