
मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण, ६ जणांचा मृत्यू.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला.
मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर, ग्रामीण भागात भीतीचं वातावरण.
राज्यभरात धुवाधार पाऊस सुरूय. मुंबई, कोकणासह विदर्भात मुसळधार पाऊस होतोय. मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूर आलाय. नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
अकोला जिल्ह्याला आज पावसाने चांगलंच झोडपलंय. अकोला जिल्ह्यातील पातुर आणि मुर्तीजापुर तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने चांगलाच तडाखा दिलाय. पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पातुर वाडेगाव मार्गावरील मोर्णा नदीला पूर आल्याने वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद झाली आहे. तर तालुक्यातील आस्टूल, पास्टूल, कोठारी, मळसूर, विवरा, आलेगाव चान्नी या परिसरात शेती आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
आज पहाटेपासूनच नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सूरू झाला. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलाय. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडालाय. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नांदेडमध्ये झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसाची दखल घेतलीय.
बीड जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
बुलढाण्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे आज आणि उद्या तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलाय. या अतिवृष्टीमुळे शहर आणि तालुक्यात बिकट प्रश्न निर्माण झालाय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. गडनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये अधून मधून होत असलेल्या पावसामुळे शिरपूर तालुक्यात असलेल्या अनेर धरणामध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. त्यामुळेच शिरपूर तालुक्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेर धरणामध्ये झपाट्याने वाढत असलेली पाणी पातळी बघता अनेर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.