

Maharashtra heavy rain forecast next 48 hours : कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला असून, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार सरी कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' कायम ठेवला आहे. तर रायगड, रत्नागिरीसह नाशिक व साताऱ्याच्या घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील ४८ तास राज्यात पावसाचा जोर कायम
मुंबई आणि पुण्यासह राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग आणि तीव्रता वाढल्यामुळे सध्या राज्यभरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे व दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील ४८ तासांनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. महाराष्ट्रातील पावसाच्या नेमक्या अंदाजाबाबत पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी ही माहिती दिली.
पुढील २४ तासांत अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज पावसाचा अंदाज काय?
मुसळधार पावसाची शक्यता (रेड अलर्ट) :
पुणे घाटमाथा, कोकण घाटमाथा, पालघर
अतिजोरदार पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा.
जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला
पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी उलथापालथ झाली असून अनेक गावांचा बाहेरील भागाशी संपर्क खंडित झाला आहेपालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आज डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा उर्वरित भागांशी संपर्क तुटला आहे.
सारणी-उर्से-ऐना या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी आल्याने, उर्सेसह परिसरातील १५ ते १६ गाव-पाड्यांचा मुख्य बाजारपेठेशी असणारा संपर्क खंडित झाला आहे. पालघर जिल्ह्यात आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, धरणातून सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सूर्या नदीकाठच्या ६४ ते ६५ गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.