
जयकुमार गोरे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील तीन बड्या नेत्यांचे नाव घेतले आहे. आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचा आरोपींसोबत संपर्क असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गोरे प्रकरणात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'मंत्री जयकुमार यांच्या संदर्भातील केस २०१६ साली सुरू आणि २०१९ साली संपली. गोरे तेव्हा भाजप पक्षात नव्हते. गोरेंकडे लाचेची रक्कम मागितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ट्रॅप लावला. सगळी मागणी टेप झाल्यानंतर पोलीस विभागाला खात्री पटली. त्यानंतर सापळा रचला आणि पैसे देताना आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. हा खरंतर ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता', असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
'ती महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशातील आहे, असा खोटा प्रचार करण्यात आला. या प्रकरणात महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण दुर्देवाची गोष्ट म्हणजे, या सगळ्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक संपर्कात होते', असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
'पुराव्यानिशी मी हे सांगतो. प्रभाकर देशमुख हे तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. मला वाईट वाटतं, कारण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी तुषार खरातला कॉल केले होते. गोरे यांच्या विरोधात जे व्हिडिओ कॉल केले होते. ते कॉल केल्यानंतर सुळे आणि पवारांना पाठवण्यात आले होते', असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.
'आता याची चौकशी होणार. आपण राजकीय शत्रू नाही. राजकीय विरोधक आहोत. अशाप्रकारे कुणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे', असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.