New Highway: नाशिक-पालघर प्रवास सुसाट, तयार होतोय १५४ किमींचा नवा महामार्ग; कुणाला होणार सर्वात जास्त फायदा?
Summary -
नाशिक–पालघर एनएच-160A महामार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी
या प्रकल्पासाठी 3,320 कोटी रुपयांचा खर्च लागणार
घोटी–त्र्यंबकेश्वर–जव्हार–मनोर–पालघर असा 154.635 किमीचा मार्ग विकसित केला जाणार
नाशिकवरून पालघर आणि पालघरवरून नाशिक असा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नाशिक ते पालघर प्रवास आता सुसाट होणार आहे. कारण महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग -160 ए च्या घोटी–त्र्यंबकेश्वर (मोखाडा)–जव्हार- मनोर- पालघर विभागाच्या 154.635 किमी लांबीच्या पुनर्वसन आणि सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक पार पडली. या प्रोजेक्टसाठी 3,320.38 कोटींचा खर्च लागणार आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषतः अंबाड आणि सतपूर परिसरात औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते. सध्या ही मालवाहतूक नाशिक शहरातून एनएच-848 मार्गे जात असल्यामुळे नाशिकच्या शहरी रस्त्यांवर मोठा ताण येत आहे. नाशिकच्या या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठीच केंद्र सरकारने या प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारने या प्रोजेक्टला मान्यता देत एन एच -160 ए चा सुधारित मार्ग त्र्यंबक मार्गे औद्योगिक क्षेत्रांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे नाशिक शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचा ओघ कमी होईल आणि परिणामी वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. मुंबईच्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील बाजूच्या वाहतुकीला एनएच -848 वरील इगतपुरी इंटरचेंजद्वारे समृद्धी महामार्ग वापरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर, वाहतुकीला एनएच-848 वरून घोटीपर्यंत प्रवास करावा लागेल आणि नंतर त्र्यंबक आणि नाशिककडे जाण्यासाठी एन एच -160 ए वापरावा लागेल.
२०२८ पासून या मार्गावर दररोज 10,000 पेक्षा अधिक वाहनांची ये-जा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या महामार्गाच्या चौपटीकरणाचा निर्णय योग्य ठरेल. एन एच-160 ए हा संबंधित विभाग जो त्र्यंबकेश्वरहून पश्चिमेकडे मानोर आणि पालघरकडे जातो. एन एच-160 एला दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, एन एच-48 आणि पश्चिम किनारपट्टी तसेच पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांशी जोडतो. सध्या या मार्गावर सुमारे 4,500 वाहनं प्रति दिन ये-जा करतात. पण मध्यवर्ती मार्ग असलेल्या रस्त्याचे दुहेरीकरणासह सुधारणा झाल्यास मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा प्रवास अधिक सुरळीत होईल.
हा प्रोजेक्ट पीएम गतीशक्तीच्या तत्त्वानुसार प्रस्तावित केला आहे आणि यामुळे महाराष्ट्र राज्यातील 6 पीएम गतीशक्ती आर्थिक नोड्स, 1 सामाजिक नोड आणि 8 लॉजिस्टिक नोड्स जोडले जाणार आहेत. यामुळे देशाच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्सवर सकारात्मक परिणाम होईल आणि त्याचा चांगला फायदा होईल. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर यामुळे वाहतुकीचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुरक्षित होईल. प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होईल आणि वाहन ऑपरेटिंग खर्च देखील घटेल. त्यासोबतच या प्रोजेक्टच्या अंमलबजावणीत आदिवासी भागातील मुलभूत पायाभूत सुविधा देखील सुधारल्या जातील. या प्रोजेक्टमुळे 19.98 लाख व्यक्तींना दिवसांचे थेट रोजगार आणि 24.86 लाख व्यक्तींना दिवसांचे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

