
सकाळची वेळ हृदयासाठी धोकादायक असते.
सकाळी कॉर्टिसोलचे प्रमाण वाढते.
रक्त गोठण्याची शक्यता सकाळी जास्त असते.
आपल्यापैकी अनेक जण सकाळी धावपळीत दिवसाची सुरुवात करतो. पटकन तयार होणं, अर्धवट किंवा अनहेल्दी नाश्ता करून बाहेर पडणं या गोष्टी आपण करतो. पण या सवयी शरीरासाठी विशेषतः हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. सकाळी थोडं लवकर उठून शांतपणे दिवसाची सुरुवात केली, तर ते केवळ मानसिक आरोग्यासाठीच नव्हे तर हृदयाच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरतं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळची वेळ ही हृदयासाठी “हाय-अलर्ट विंडो” मानली जाते. कारण या वेळेस शरीरातील नैसर्गिक बदल हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढवतात.
२०२० मध्ये Trends in Cardiovascular Medicine या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार अनेक वर्षांपासून हृदयविकाराचे झटके ठराविक पद्धतीने येत असल्याचे दिसून आले होते.
१९८०-९० च्या दशकातील अभ्यासातून असं लक्षात आलंय की, सकाळी ७ ते ११ या वेळेत सर्वाधिक रुग्णांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो. काही संशोधनात सोमवारी अधिक रुग्णांना हृदयविकाराचा झटका येतो असे दिसले. याचे कारण आठवड्याची सुरुवात आणि त्यातून निर्माण होणारा ताण असे मानले गेले.
इतकंच नाही तर थंडीत अचानक हृदयविकाराचं प्रमाण वाढतं असंही निरीक्षण केलं गेलं आहे. या पॅटर्नमागे शरीरातील नैसर्गिक बदल जसं की रक्तदाब, हृदयाची गती आणि कोर्टिसोलसारख्या स्ट्रेस हार्मोन्समधील चढउतार जबाबदार मानले गेले.
गेल्या दशकात झालेल्या नवीन संशोधनांनुसार हा पारंपरिक पॅटर्न बदलताना दिसतो. Oregon Sudden Unexpected Death Study या मोठ्या अभ्यासात सकाळी किंवा सोमवारी हृदयविकाराचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट दिसले नाही.
बीटा ब्लॉकर्ससारखी औषधं आता मोठ्या प्रमाणावर दिली जातात. ज्यामुळे कोर्टिसोलचा परिणाम कमी होतो.
हृदयविकार आणि हृदय निकामी होण्यावरील आधुनिक उपचारांमुळे परिस्थिती बदलली आहे.
अधिक तास कामकाज, तंत्रज्ञान आणि सततचा ताण यामुळे धोके आता दिवसभर समान प्रमाणात पसरले आहेत, त्यामुळे “सोमवारी शिखर” हा पॅटर्न कमी झाला आहे.
राठोड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. अनिकेत राठोड यांनी सांगितलं की, सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो, हे खरं आहे. कारण आपलं शरीर झोपेत पूर्णपणे रिलॅक्स अवस्थेत असतं. पण अचानक झोपेतून उठल्यावर शरीराला पटकन ऊर्जा लागते. ही ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरात ताण वाढवणारा ‘कॉर्टिसोल’ नावाचा हार्मोन मोठ्या प्रमाणात तयार होतो. कॉर्टिसोलमुळे शरीराची बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) वाढते, रक्तदाब (BP) वाढतो आणि हृदयाचे ठोके जलद होतात. त्यामुळे हृदयावर ताण येतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमनींमधून रक्त मर्यादित प्रमाणातच मिळतं.
याशिवाय, सकाळच्या वेळी शरीरातील रक्त गोठवण्याची क्षमता वाढलेली असते. त्यामुळे रक्तात गुठळ्या तयार होण्याचा धोका जास्त असतो. ही गुठळी कोरोनरी धमनीत अडकल्यास रक्तप्रवाह थांबतो आणि त्यातून हृदयविकाराचा झटका (heart attack) येऊ शकतो, असंही डॉ. राठोड यांनी सांगितलंय.
तज्ज्ञांच्या मते, सकाळची सुरुवात शांतपणे करणं आवश्यक आहे. घाईघाईने किंवा तणावात दिवसाची सुरुवात टाळावी.
उठल्यावर सर्वप्रथम पाणी प्यावे.
हृदयाशी संबंधित औषधे घेत असाल तर ती वेळेवर घ्यावीत.
दिवसाची सुरुवात करण्यासाठी प्रोटीनयुक्त नाश्ता घ्यावा.
१० ते १५ मिनिटे सौम्य व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करावे.
दिवसाची सुरुवात हळूहळू करा, जेणेकरून हृदयावर ताण कमी पडेल आणि संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा मिळेल.
सकाळी हृदयविकाराचा झटका का येतो?
सकाळी कॉर्टिसोल वाढून रक्तदाब आणि ठोके वाढतात, त्यामुळे धोका असतो.
हृदयावर ताण कमी करण्यासाठी सकाळी काय करावे?
शांतपणे उठून पाणी प्यावे आणि सौम्य व्यायाम करावा.
सकाळी रक्त गोठण्याचा धोका का असतो?
शरीरात रक्त गोठवण्याची क्षमता सकाळी वाढलेली असते.
हृदयरोगी रुग्णांनी सकाळची सुरुवात कशी करावी?
प्रोटीनयुक्त नाश्ता, औषधे वेळेवर घेऊन शांतपणे सुरुवात करावी.
सकाळच्या कोणत्या वेळेत हृदयविकाराचा धोका जास्त असतो?
सकाळी ७ ते ११ या वेळेत हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.