

Anurag Kashyap: बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुरत येथील न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये त्याला ७ मे २०२५ रोजी न्यायालयात वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या वकिलामार्फत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जर ते अनुपस्थित राहिले, तर न्यायालय त्यांच्या विरोधात एकतर्फी कारवाई करू शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.
ही नोटीस सुरत येथील वकील कमलेश रावल यांनी २२ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे जारी करण्यात आली आहे. या तक्रारीत अनुराग कश्यपवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांखाली आरोप करण्यात आले आहेत, यामध्ये समाजात वैमनस्य पसरवणे, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणे, धमकी देणे, अपमान करणे आणि बदनामी करणे यांचा समावेश आहे. अनुरागने १६ एप्रिल रोजी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे.
या वादग्रस्त पोस्टनंतर देशभरातून नाराजी व्यक्त करण्यात आली १७ एप्रिल रोजी ती पोस्ट हटवली. त्यानंतर त्यांनी १७ आणि १९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर माफी मागणारे व्हिडिओ शेअर केले. मात्र, तक्रारदार कमलेश रावल यांनी या माफीनाम्याला अपुरा मानत, अनुरागवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनुराग कश्यपने पूर्वीही धार्मिक समुदायांविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, यामुळे समाजात तणाव निर्माण झाला आहे.
अनुराग कश्यपने त्याच्या माफीनाम्यात ब्राह्मण समाजाविषयी वापरलेल्या भाषेबद्दल माफी मागितली आहे. त्याने म्हटले आहे की, "मी संपूर्ण ब्राह्मण समाजाविषयी चुकीची भाषा वापरली. या समाजातील अनेक लोक माझ्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी माझ्या आयुष्यात मोठे योगदान दिले आहे. माझ्या कुटुंबीयांनाही या प्रकरणामुळे त्रास झाला आहे." तसेच, त्याने भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची खात्री दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.