रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील अंतिम सामना हा एका रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबईने विदर्भाला जिंकण्यासाठी ५३२ धावांचे आव्हान दिले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाचा डाव ३६८ वर आटोपला. यासह मुंबईने हा सामना १६९ धावांनी जिंकला आहे. मुंबईने ४२ व्या वेळेस रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दरम्यान या विजयानंतर मुंबई संघावर पैशांचा पाऊस पाडला जाणार आहे.
विदर्भाकडून धावांचा पाठलाग करताना कर्णधार अक्षय वाडकर आणि दुबेने महत्वपूर्ण भागीदारी केली. अक्षय वाडकरने झुंजार शतकी खेकी केली. दरम्यान शतक झळकावल्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला. इथून मुंबईच्या विजयाचा काऊंटडाउन सुरू झाला. मुंबईच्या गोलंदाजांनी विदर्भाच्या धावांचा गाडा ३६८ धावांवर रोखला. यासह ४२ व्या वेळेस रणजी ट्रॉफीवर कब्जा केला.
या विजयानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक म्हणाले की, ' एमसीए अध्यक्ष अमोल काले आणि ॲपेक्स कमिटीने रणजी ट्रॉफीची प्राईज मनी दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून विजेत्या संघाला अतिरिक्त ५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. हे वर्ष एमसीएसाठी खूप चांगलं राहिलं आहे. कारण या वर्षी एमसीएने ७ जेतेपदं पटकावली आहेत. तसेच बीसीसीआयच्या सर्व स्पर्धांमध्ये नॉकआऊटमध्ये प्रवेश केला आहे.' (Cricket news in marathi)
रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचा दबदबा राहिला आहे. मुंबईने ९० वर्षांच्या इतिहासात ४८ वेळेस फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यासह ४२ वेळेस फायनल जिंकली आहे. मुंबईचे मुख्य प्रशिक्षक ओंकार साल्वी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, ' खूप कमी अशा संस्था आहेत जिथे खेळाडूंना नोकरी दिली जाते. फ्रेंचायजी क्रिकेटकडे खेळाडू आकर्षित होतात कारण तिथे पैसा आहे. हा निर्णय त्या खेळाडूंच्या हिताचा आहे ज्यांच्याकडे नोकरी किंवा हवी तितकी कमाई नाही.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.