मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगडसाठी हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन
राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सर्व विभाग अलर्ट मोडवर
धबधबे, घाट परिसर आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याच्या सूचना
राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे शहरासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. अशातच हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता आता सरकारने महत्वपूर्ण पाऊलं उचलत उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे सांगितले. या पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून अनावश्यक प्रवास टाळावा. घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. विधानसभेत राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती बाबत माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हवामानातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या अतिवृष्टी, दरडी कोसळणे आणि जोरदार वाऱ्यासारख्या घटना या निसर्गाच्या बदललेल्या चक्राचा भाग आहेत. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने पूर्वतयारी केली असली तरी काही वेळा अपेक्षेपेक्षा वेगळ्या घटना घडत असतात. मात्र अशा प्रत्येक परिस्थितीत महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित सर्व विभाग रस्त्यावर उतरून तातडीने मदतकार्य करत आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, 'नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक ठिकाणी त्वरित वाहतूक वळविणे, रस्ते बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणणे तसेच पाण्यात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन गेल्या २ दिवसांत धोकादायक भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.'
तसंच, 'आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून दुपारनंतर राज्यातील काही भागांत जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळावा आणि कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये. तरुणांनी पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणे पूर्णपणे टाळावे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.