समृद्धी महामार्गावर एका महिन्यात ९० कोटी टोल वसुली करतो.
समृद्धी महामार्ग दुसऱ्या क्रमांकाचा महसूल वसुल करणारा महामार्ग ठरला.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे महिन्याला १२० कोटी टोल वसूल करतो.
समृद्धी महामार्गावर ११ लाख वाहनांची वाहतूक.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या पसंतीचा ठरत आहे. या महामार्गावरून प्रवाशांना सुसाट आणि कमी वेळेत प्रवास करता येत आहे. त्यामुळेच या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका महिन्यामध्ये या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या टोल वसुलीमधून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ९० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गानंतर सर्वाधिक जास्त टोलमधून कमाई करणारा हा दुसरा महामार्ग ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७०१ किमी लांबीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग राज्यातील सर्वाधिक महसूल मिळवणाऱ्या महामार्गांपैकी एक ठरला आहे. ९० कोटी रुपयांच्या महिन्याच्या उत्पन्नासह समृद्धी महामार्ग हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक टोल कमाई करणारा महामार्ग ठरला आहे. समृद्धी महामार्गावरील टोल वसुलीतून राज्याला चांगला फायदा होत आहे आणि दिवसेंदिवस टोल वसुली वाढत आहे. यामागचे कारण म्हणजे समृद्धीवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू झाल्यानंतर त्यावरून महिनाभरात ११ लाख वाहनांनी प्रवास केला. यातूनच ९० कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
समृद्धी महामार्गाचा मासिक टोल ९० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो सर्वाधिक टोल कमाई करणारा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग ठरला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत आहे. हा महामार्ग राज्याला टोलमधून महिन्याला १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून देतो. तर पुणे-बंगळुरू महामार्ग टोलमधून राज्याला महिन्याला ६१ कोटी रुपयांची कमाई करून देतो.
समृद्धी महामार्गावर सध्या कार आणि एसयूव्ही वाहनांसाठी एका बाजूने १,४५० रुपये टोल आकारला जातो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि एसयुव्ही वाहनांसाठी एका बाजूने ३२० रुपये टोल आकारला जातो. तर पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि एसयुव्ही वाहनांसाठी एका बाजुने १२० रुपये टोल आकारला जातो. म्हणजे सर्वात जास्त टोल समृद्धी महामार्गावर आकारला जातो.
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, 'समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी तब्बल ५५,००० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हा खर्च मिळवण्यासाठी राज्याला किमान ४० वर्षांचा कालावधी लागू शकतो. पण वाहनचालकांची वाढती संख्या आणि दर ३ वर्षांनी नियोजित टोल रेट यामुळे राज्याला फायदा होऊ शकतो.' तसंच, राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे सांगितले की, 'समृद्धी कॉरिडॉरमुळे विदर्भातील पर्यटन स्थळे आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये नागरिकांचा प्रवास वाढला आहे. याठिकाणी जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे.'
या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, 'मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग हे राज्याचे दोन प्रमुख टोलमधून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे महामार्ग आहेत. याशिवाय राज्यातील इतर प्रमुख महसूल मिळवून देणाऱ्या महामार्गांमध्ये पुणे-सातारा-कागल महामार्ग (पुणे-बंगळुरू महामार्ग), जुना मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्ग यांचा समावेश होतो. समृद्धी महामार्ग जुन्या मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक आणि टोल महसूल वळवू शकतो. सध्या राज्यातील मुंबई-गोवा महामार्ग हा सर्वात जास्त विलंबित महामार्ग आहे. अपूर्ण विस्तार आणि कोकणातील जनतेच्या विरोधामुळे सध्या या मार्गावर कोणताही टोल वसूल केला जात नाही.
समृद्धी महामार्गावर एका महिन्यात किती टोल वसूल झाला?
समृद्धी महामार्गावर एका महिन्यात ९० कोटी रुपयांचा टोल वसूल झाला.
महाराष्ट्रातील सर्वाधिक टोल कमाई करणारा महामार्ग कोणता आहे?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा सर्वाधिक टोल कमाई करणारा महामार्ग आहे.
समृद्धी महामार्गावर किती वाहनांनी प्रवास केला?
एका महिन्यात ११ लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावर प्रवास केला.
समृद्धी महामार्गावरील टोल दर किती आहे?
कार आणि एसयूव्ही वाहनांसाठी एका बाजूने १,४५० रुपये टोल आकारला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.