LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट
जागतिक तणावामुळे एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता.
काही ठिकाणी व्यावसायिक एलपीजी वितरणावर बंधने.
सरकारने भारतातील ऊर्जा पुरवठा सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.
पश्चिम-आशियामधील युद्ध आणि जगातील तणावामुळे भारतातील एलपीजी आणि क्रूड आईलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस वितरणावर बंधने घातलण्यात आली आहेत. घरगुती सिलिंडरच्या किंतमीही वाढल्या आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
याचदरम्यान सरकारनं दिलासा देणारी बातमी दिली आहे. भारताचा ऊर्जा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. तेल आणि गॅसचा पुरवठा स्थिर आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सरकारनं म्हटलंय. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि ऑइल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत सुमारे ४० वेगवेगळ्या देशांमधून कच्च्या तेलाची आयात करतो.
यामुळे पुरवठ्यासाठी कोणत्याही एका प्रदेशावर अवलंबून राहणं कमी आहे. भारताचा एकूण कच्च्या तेलाचा वापर अंदाजे १८९ दशलक्ष मेट्रिक टन आहे. दररोज अंदाजे ५.५ दशलक्ष बॅरल तेलाची आवश्यकता असते. चांगली गोष्ट म्हणजे युद्धाची परिस्थिती असूनही, तेल पुरवठा सुरू आहे. अलीकडेच दोन कच्च्या तेलाचे कार्गो देखील भारताकडे रवाना झाले आहेत.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील अवलंबित्व कमी झालं
सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, भारताने आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी विविध पुरवठा मार्ग निर्माण केली आहेत. सध्या अंदाजे ७० टक्के कच्चे तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय इतर मार्गांनी भारतात येत आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर प्रादेशिक तणावाचा परिणाम कमी होत आहे. देशांतर्गत पीएनजी आणि वाहन सीएनजी पुरवठा पूर्णपणे सामान्य आहे. जागतिक परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी, देशातील अत्यावश्यक सेवांवर त्याचा परिणाम झाला नाहीये.
सुजाता शर्मा यांनी असेही स्पष्ट केले की, लोकांना एलपीजी सिलिंडरची काळजी करण्याची गरज नाही. बुकिंग केल्यानंतर अंदाजे अडीच दिवसांत सिलिंडर मिळेल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा काळ संपूर्ण जगासाठी निश्चितच आव्हानात्मक आहे, परंतु भारतातील ऊर्जा पुरवठ्याची परिस्थिती सध्या स्थिर आणि नियंत्रणात आहे.

