धकाधकीच्या जीवनात अनेकांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अशावेळेस लोक काही सामान्य वाटणाऱ्या आजारांकडे सहज दुर्लक्ष करतात. वारंवार सांधे दुखी, सर्दी, खोकला, अचानक थकवा जाणवणं, सतत अॅसिडीटीचा त्रास या समस्या तुम्ही घरच्यांकडून आणि २५ वर्षापुढील व्यक्तींकडून ऐकल्याच असतील. अर्थात याला तुमची चुकीची जीवनशैली कारणीभूत ठरते. पण याने तुमच्या महत्वाच्या अवयवांचं खूप नुकसान होत असतं. कारण काही जीवघेण्या आजारांची लक्षणे जाणवत नाहीत. यातला एक आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर.
हाय ब्लड प्रेशर हा आजार सुरुवात झालाय हे बऱ्याचदा कळत नाही. कारण याची लक्षण दिसत नाहीत पण शरीरात हळूहळू मोठं नुकसान करतात. त्यामुळे याला सायलेंट किलर असंही म्हणतात. तुम्ही रोजच्या रोज याची तपासणी करणं महत्वाचं आहे. पण याचा आकडा जास्तच राहत असेल तर शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांचं नुकसान होतं.
जेव्हा शरीरातला रक्तदाब वाढतो, तेव्हा रक्तवाहिन्यांवर जास्त दाब पडतो. त्याने रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींवर सूक्ष्म जखमा तयार होतात. त्या जखमांमध्ये चरबी ( Fat) साचायला लागतो आणि हळूहळू रक्तवाहिन्या अरुंद होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
मेंदूच्या बाबतीतही हाय ब्लड प्रेशर अतिशय धोकादायक ठरतं. मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या फुटू शकतात किंवा त्यात अडथळा येऊ शकतो. यामुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. बरेच दिवस हाय ब्लड प्रेशर राहिल्याने स्मरणशक्ती कमी होते, विचारशक्तीवर परिणाम होतो आणि डिमेन्शियाचा आजार होऊ शकतो.
डोळ्यातल्या सगळ्यात नाजूक रक्तवाहिन्यांवरही उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो. या रक्तवाहिन्या फुटू शकतात, सूज येते किंवा रक्तपुरवठा कमी होतो अशा समस्या उद्भवू शकतात. यामुळे डोळ्यांनी धूसर दिसतं ते कायमची दृष्टी जाण्यापर्यंत धोकाही निर्माण होऊ शकतो.
जेव्हा हृदयाला सारखं जास्त दाबाविरुद्ध रक्त पंप करावं लागतं, तेव्हा हृदयाचे स्नायू जाड होतात. सुरुवातीला हे शरीराला उपयोगी वाटत असलं तरी कालांतराने हृदय थकतं आणि नीट काम करू शकत नाही. याने हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो.
किडनीवर उच्च रक्तदाबाचा गंभीर परिणाम होतो. किडनीमधल्या रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे शरीरातील घाण फिल्टर करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता वाढते आणि अनेक रुग्णांना डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची (Transplant) गरज भासू शकते.
तज्ज्ञांच्या मते, वेळेत उपचार, नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवल्याने उच्च रक्तदाबामुळे होणारे हे गंभीर धोके टाळता येऊ शकतात. त्यामुळे रक्तदाबाकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी उपचार घेणं अत्यंत गरजेचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.