
आज क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानने अखेर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे आणि भारतीय चाहत्यांनाही आता टीम इंडियाच्या विजेतेपदाचा क्षण अनुभवण्याची आतुरता आहे.
फायनलमध्ये भारतीय संघ केवळ प्लेइंग-11 नव्हे तर एक प्रकारचं सुपर-11 घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादव दोन महत्त्वाचे बदल करून टीमला अंतिम लढतीसाठी सज्ज करेल.
पाकिस्तानची टीम या स्पर्धेत मोठ्या तयारीनिशी उतरला होती. पण फायनलपर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. फायनलपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना फार कठीण परिस्थितीचा सामना करावा लागलाय. भारताने त्यांना सलग दोन वेळा पराभूत केलं.
लीग स्टेजमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आणि त्यानंतर सुपर-4 मध्येही त्यांना गारद केलं. तरीही अखेरीस पाकिस्तानने कसंबसं फायनलचा तिकीट मिळवलं. आता या मोठ्या सामन्यासाठी भारत दोन धोरणात्मक बदलांसह उतरू शकतो.
पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडिया कोणतीही जोखीम घेणार नाही. श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-4 सामन्यापूर्वीच भारताचं फायनलमध्ये स्थान निश्चित झालं होतं. त्यामुळे त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने काही प्रयोग केले. शिवम दुबेंच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली होती, तर जसप्रीत बुमराहऐवजी अर्शदीप सिंगला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र आजच्या सामन्यात दुबेला संधी नक्कीच दिली जाऊ शकते.
हा सामना अगदी अटीतटीचा झाला आणि भारताने सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात थरारक विजय मिळवला. त्यामुळे फायनलमध्ये टीम कोणताही प्रयोग न करता सर्वोत्तम खेळाडू घेऊन मैदानात उतरणार आहे.
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विश्रांतीवर होता. मात्र फायनलसाठी त्याचं टीममध्ये कमबॅक होण्याची पूर्ण शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनलमध्ये आतापर्यंत पाच वेळा सामना झाला आहे. यापैकी पाकिस्तानने तीन तर भारताने दोन वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे इतिहासाकडे पाहता सामना अत्यंत चुरशीचा होणार हे स्पष्ट आहे.
टीम इंडिया पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून जर टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करत हा अंतिम सामना जिंकला, तर ही भारताची नववी आशिया कप ट्रॉफी ठरणार आहे. त्यामुळे रविवारी रंगणारं हे युद्ध केवळ विजेतेपदासाठीच नव्हे, तर अभिमान, परंपरा आणि चाहत्यांच्या भावनांसाठीही असणार आहे.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या/अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.