

श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अपडेट
श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया
साधारण आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहणार
श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात गंभीर दुखापत झाली होती. शरीरात रक्तस्राव झाला होता. स्प्लीनिक रप्चर आणि बरगडीला गंभीर इजा झाल्यानं त्याला सिडनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आता त्याच्या दुखापतीसंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ती यशस्वी देखील झाली आहे. आयसीयूमधून त्याला शिफ्ट करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. श्रेयस अय्यरला किमान पाच दिवस आणि जास्तीत जास्त आठवडाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, स्प्लीनिक रप्चरला झालेल्या दुखापतीमुळं शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. सिडनीत अखेरच्या वनडे सामन्यात झेल घेण्यासाठी मागच्या दिशेने धावला होता. डाइव्ह मारत त्यानं तो झेल घेतला. पण त्याचवेळी तो मैदानात जोरानं आपटला. यात त्याच्या बरगडीलाही मार लागला होता. शरीरात रक्तस्राव झाला होता. त्यामुळं त्याला आयसीयूमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर लहान शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अय्यरला किमान पाच दिवस आणि कमाल आठवडाभर तरी रुग्णालयात राहावं लागणार आहे.
३० वर्षीय श्रेयस अय्यर मंगळवारपासून फोन कॉल्सना उत्तर देत आहे. त्याचे ऑस्ट्रेलियातील मित्र त्याची देखभाल करत आहेत. त्यांच्याच घरचं जेवण श्रेयसला दिलं जात आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम सिडनी आणि भारतातील विशेषज्ज्ञांच्या सल्ल्यानं श्रेयसच्या प्रकृतीची विशेष काळजी घेत आहे.
अय्यरला साधारण तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहावं लागेल असे सुरुवातीला सांगण्यात येत होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानंही श्रेयसच्या आरोग्यासंदर्भात माहिती दिली होती. भारताला बुधवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी २० मालिका खेळायची आहे. श्रेयसचा टी २० संघात समावेश नाही.
सूर्यकुमार यादवने या मालिकेला सुरुवात होण्याआधी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यानं श्रेयसबद्दल सर्व अपडेट दिली. श्रेयससोबत चर्चा झाली आहे. त्याला गंभीर दुखापत झाली आहे हे समजल्यानंतर आधी त्यालाच फोन केला. पण त्याच्याकडे फोन नव्हता. त्यानंतर फिजिओ कमलेश जैन यांना फोन केला. श्रेयसची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं.
आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यासोबत दोन दिवसांपासून बोलणं होत आहे. तो प्रतिसाद देत आहे. फोनवर रिप्लाय देतोय म्हणजे तो आता बरा आहे असा त्याचा अर्थ होतो. डॉक्टरही त्याच्यासोबत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. तो बोलत आहे म्हणजे सर्वकाही ठीक आहे. काही दिवस तो देखरेखीखाली असेल. चांगली गोष्ट ही आहे की तो आता सर्वांशी बोलतोय, असं सूर्यकुमार म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.