घराच्या अंगणात पडलेले आंबे खाल्ल्याने विषबाधेतून (Food Poisoning) दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. अवघ्या २४ तासांच्या अंतराने या दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वरी (वय १७) आणि तिची लहान बहीण संध्या (वय १०) या दोन्ही मुलींनी रविवारी त्यांच्या घराजवळ पडलेले काही आंबे उचलले आणि ते खाल्ले. आंबे खाल्ल्यानंतर रविवारी संध्याकाळीच त्यांची प्रकृती बिघडली. दोघींनाही उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. मुलींची प्रकृती खालावल्याचे पाहून पालकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मोठी बहीण भुवनेश्वरी हिचा मृत्यू झाला. तर, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही लहान बहीण संध्या हिने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. एकाच वेळी दोन चिमुरड्या मुली गमावल्यामुळे पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बहिणींचा मृत्यू विषबाधेमुळे (Food Poisoning) झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन (Postmortem) करण्यात आले असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या धक्कादायक घटनेनंतर मुलींच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. नारायणगुडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मुलींनी खाल्लेले आंबे विषारी होते का, किंवा त्यावर काही रासायनिक औषध फवारले होते का, यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.