राघव चड्ढा यांच्या समवेत 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पंजाबच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आम आदमी पक्षाचे हरियाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, येणाऱ्या काही दिवसात पंजाबचे जवळपास 28 आमदार पक्ष सोडणार असून पंजाब सरकार देखील व्हेंटीलेटरवर आहे. पक्षात देखील अस्वस्थता वाढत चालली आहे.
जयहिंद म्हणाले जे खासदार पक्ष सोडून गेले आहे. त्यांच्यासोबत दुर्व्यवहार सुरू होता आणि मारहाण देखील करण्यात आली होती असा मोठा दावा त्यांनी केला. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव होता. यामुळे पक्षातील नेते अस्वस्थ असून पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आम आदमी पक्षात कालपासून मोठी खळबळ उडाली असून आपचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांची पंजाबचे मंत्री बलवीर सिंह यांनी भेट घेतली. बलवीर सिंह म्हणाल पंजाबमध्ये भाजप ऑपरेशन लोटस राबवत आहे. या सर्व खासदारांनी पंजाबचा विश्वासघात केलाय.
पंजाबमध्ये पुढील वर्षी मतदान होत असल्याने भाजपने याच आधी मोठा डाव टाकला असून मुख्यमंत्री भगवंत मान यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच 28 आमदार पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरू असताना आगामी काळात काही वेगळे राजकीय चित्र निर्माण होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पंजाबचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी सांगितले की पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारे पत्र आम आदमी पार्टी लवकरच राज्यसभेच्या अध्यक्षांना सादर करणार आहे. खासदार संजय सिंह या संदर्भात उपराष्ट्रपतींना एक निवेदन सादर करतील. चीमा यांनी सांगितले की, केवळ तीन खासदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. स्वाती मालीवाल आणि राजिंदर गुप्ता या दोन खासदारांच्या सह्या बनावट आहेत.