
पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतानं अद्दल घडवली. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळं बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या सीमेजवळील राज्यांमध्ये हल्ले सुरू केले. या हल्ल्यांना भारतानं जोरदार प्रत्त्युत्तर दिले. भारतानं पाकिस्तानला प्रत्येक आघाडीवर उघडं पाडलं. कर्जस्वरुपात जगासमोर आर्थिक मदत म्हणून भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भारताच्या चोख उत्तरामुळं थरथर कापणारा पाकिस्तान आता गयावया करू लागल्याचं चित्र आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शनिवारी महत्वाचं विधान केलं आहे. भारताकडून हल्ले थांबले तर, पाकिस्तान सुद्धा शांततेबाबत विचार करेल, असं परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत. पण त्याचवेळी पोकळ धमकीही देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. भारताकडून नव्याने हल्ला झाला तर आमच्याकडून उत्तर मिळेल, असं ते म्हणाले.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी जियो न्यूजला एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी माघार घेण्यासंबंधी वक्तव्य केलं आहे. भारत थांबला तर, आम्हीही येथेच थांबण्याचा विचार करू शकतो, अशी विनंती एकप्रकारे त्यांनी केली आहे. हाच संदेश आम्ही अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांनाही दिला आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिया यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हीही त्यांच्याशी चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले.
भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याची शपथच भारतानं घेतली होती. त्यानंतर भारतानं ही कारवाई केली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला.
भारतानं वर्मावरच घाव घातल्यानं बिथरलेल्या पाकिस्ताननं आगळीक करत भारतातील नागरी भागांत हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतानंही तितक्याच ताकदीने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. भारतानं डोळे वटारल्यानंतर पाकिस्तान नरमला आहे. त्यात अमेरिकेनंही दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आणि थेट संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना उपरती आली.
एकीकडं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री विनवण्या करत असले तरी, अगाऊपणा सुरूच आहे. पाकिस्तानच्या लष्करानं आपल्या सैनिकांना सीमावर्ती भागांत पाठवलं आहे. त्यामुळं तणाव वाढत आहे, असं भारताकडून सांगण्यात आलं. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा पर्दाफाश केला. पाकिस्तानी लष्कराकडून त्यांच्या सैन्यांना सीमेजवळील भागांत पाठवले जात असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने पंजाबमध्ये मिसाइल डागली. तसेच श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूरमध्ये वैद्यकीय सुविधा केंद्रांवर हल्ले केले, अशी माहितीही त्यांनी दिली.
पाकिस्तानी हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानी सैन्यानं पंजाबमधील हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी मध्यरात्री एक वाजून ४० मिनिटांनी मिसाइलचा वापर केला. तसेच पश्चिमी सीमेवरील भारतीय लष्कराच्या ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी ड्रोन, दूरवर मारा करणारे शस्त्रे, जेट विमानांचाही वापर केला, अशी माहितीही कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.