

Nitish Kumar : बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण, याबाबत संपूर्ण देशाला उत्सुकता आहे. नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. याबाबत बिहार सरकारमधील मंत्री विजय चौधरी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि नव्या सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त त्यांनी सांगितला आहे.
बिहारचं राजकारण काटकोनात बदललं आहे. नेतृत्वबदलाची दिशा ठरली आहे. ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आधीच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा देतील. त्यामुळे बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांचे निकटवर्तीय आणि मंत्री विजय चौधरी यांनी याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
नितीश कुमार हे प्रादेशिक राजकारणातून थेट दिल्लीच्या राजकीय वर्तुळात प्रवेश करत असून, त्याची स्क्रिप्टही लिहिली गेली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ते नव्या सरकारचा शपथविधी याबाबतची टाइमलाइनही निश्चित झालीय. त्याबाबत चौधरी यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री कधी पदाची शपथ घेतील, तो दिवसच चौधरी यांनी सांगितला आहे.
विजय चौधरी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. ९ एप्रिल रोजी नितीश कुमार हे दिल्लीला रवाना होतील. १० एप्रिल रोजी ते राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतील. त्यानंतर राज्यातील नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. त्याची प्रक्रिया सुरू होईल, असे चौधरी म्हणाले.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर एनडीएमधील सहभागी सर्व पक्षांची महत्वाची बैठक होईल. नव्या सरकारच्या स्थापनेबाबत अंतिम निर्णय होईल. त्यानंतरच नवे सरकार स्थापन करण्यात येईल. नितीश कुमार यांच्या राजीनाम्याआधी मंत्रिमंडळाची बैठक व्हायला हवी. ती आवश्यक आहे, असे सांगतानाच, नितीश कुमार हे थेट राज्यपालांकडे राजीनामा सोपवतील, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री १० तारखेला शपथ घेतील. त्यानंतर नव्या सरकारची स्थापना होईल. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एनडीएतील सर्व पक्षांची बैठक होईल. त्यात सरकार कधी स्थापन होईल याबाबतचा निर्णय होईल, अशी माहितीही चौधरींनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, १० एप्रिलला राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ११ आणि १२ एप्रिल रोजी दिल्लीत पंतप्रधान आणि अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करतील. त्यानंतर थेट पाटण्यात परततील. राज्यपालांकडे राजीनामा सोपवतील. १३ एप्रिल रोजी नितीश कुमार कॅबिनेटची अंतिम बैठक घेतील. त्यात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी नवे मुख्यमंत्री कोण असतील, संभाव्य नावांवर चर्चा होईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल. १४ एप्रिलला नितीश कुमार हे राज्यपालांकडे राजीनामा सोपवतील. १४ किंवा १५ एप्रिल रोजी बिहारचे नवे मुख्यमंत्री शपथ घेतील, अशी चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.