

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीये. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील आठ जणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. मृतांमध्ये शेजारील तामिळनाडू राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे 11.40 वाजता हा अपघात झाला. कॅपामंगलम परिसरातील पनंबिकुन्नूमध्ये महामार्गाच्या कडेला एक लॉरी उभी होती. गुरुवायूरहून कोडुंगलूरच्या दिशेने जाणारी कार या उभ्या लॉरीवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारमधील सर्व आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांसह अग्निशमन आणि बचाव पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केलं. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर सर्व मृतदेह त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवागारात नेण्यात आले.
अपघातातील कार तामिळनाडूमध्ये नोंदणीकृत असल्याची पोलिसांनी माहिती दिलीये. कारमधील मृत व्यक्ती तामिळनाडूतील विद्यार्थी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र त्यांची ओळख आणि अपघाताचं नेमकं कारण याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातही अशाच प्रकारची भीषण दुर्घटना घडली होती. गोहद चौराहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छीमका गावाजवळ मजुरांनी भरलेल्या वाहनाला ट्रकने धडक दिली होती. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर 22 जण जखमी झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे मजूर भाताची लागवड करून परतत होते. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 719 वर त्यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिली. अपघातानंतर पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या आणखी तीन जणांचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.